चैत्यभूमीवरून भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी समीर वानखेडेंना दाखवला घरचा रास्ता
मुंबई : खोटा जातीचा दाखला सादर करून प्रशासकीय नोकरी बाळकवल्याचा आरोप झालेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आज अचानक चैत्यभूमी येथे हजेरी लावली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमशक्ती रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांनी समीर वानखेडे यांना मज्जाव केला. समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका घेत भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडे यांना घरचा रास्ता दाखवला.
समीर वानखेडे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करून बाहेर पडत असताना हा प्रकार घडला. कार्यकर्ते आणि वानखेडे यांच्यात वाद झाला. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करून वानखेडे यांना सुरक्षित बाहेर काढले.
यावेळी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष दगडू कांबळे म्हणाले, समीर वानखेडेंना बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या विचारधारेवर चालले पाहिजे. समीर वानखेडेंना आजच चैत्यभूमीवर येण्याची गरज का भासली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नमाज पढायला तर ते नियमितपणे यायचे- नवाब मलिक
समीर वानखेडे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकही चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी आले. यावेळी नवाब मलिक म्हणाले की, बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा अधिकार प्रत्येकाचाच आहे. तो कोणत्याही धर्माचा असो वा जातीचा. काही लोकांनी नव्यानं इथे येण्यास सुरुवात केली हे चांगलंच आहे. मी जो संघर्ष सुरु केलाय त्याचा जयभीम इम्पॅक्ट आता सुरु झाला आहे. समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचे पाहिलंय का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की, समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर इतक्या वर्षात अभिवादनाकरता आले का नाही हे मला माहित नाही पण, ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे हे माहिती आहे, असही मलिक म्हणाले.
