आज मुंबई, पुण्यासह 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणे:गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा सुरू आहे. आठवडाभर ढगाळ हवामानाची नोंद झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांसाठी कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मुंबई पुण्यासह 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
खरंतर, सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 24 तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव आणि लक्षद्वीप परिसरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
