Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

स्मारके उभी करायची तर शाळांना स्मारके करायला हवीत – राज्यमंत्री बच्चू कडू

पुणे : गरीबी हा विषय कोणाच्याही शिक्षणामध्ये आडवा येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवे. समाज मन व शासन धोरण जेव्हा चांगले निर्णय घेते, तेव्हा राष्ट्रउभारणी होते. स्वातंत्र्यानंतर देखील ७० ते ८० वर्षात चांगले शिक्षण नाही, हे दु:ख आहे. त्यामुळे स्मारके उभी करायची तर शाळांना स्मारक केले पाहिजे. राष्ट्रउभारणीसाठी प्रत्येकाची ज्ञानाची तहान भागवायला हवी, असे मत राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा तर्फे हुजूरपागा इंग्लिश मिडियम स्कूल लक्ष्मी रस्ता या शाळेच्या सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल इंग्लिश मिडियम स्कूल अशा नामकरण समारंभाचे आयोजन सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी आर.एम.धारिवाल फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारिवाल, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर, सोसायटीच्या मुख्य विश्वस्त जयश्री बापट, अध्यक्षा रेखा पळशीकर, उपाध्यक्षा हिमानी गोखले, सचिव वरदेंद्र कट्टी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोनशिला व नामफलक अनावरण करण्यात आले. शोभा धारिवाल यांनी या शाळेसाठी प्रमुख देणगी दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले, शिक्षण, आरोग्य आणि शेतकरी याविषयीचा कार्यक्रम प्रत्येक सरकारने राबवायला हवा. अनेकदा सरकार असे राबविताना दिसत नाही. आपल्याला जर स्मारके उभी करायची असतील, तर शाळांना स्मारके केली पाहिजेत. आमदार, व्यापारी व कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळांमध्ये व शिक्षणामध्ये प्रचंड विषमता आहे. प्रत्यक्षात प्रत्येक शिक्षकाचे काम सैनिकाप्रमाणे आहे. शिक्षणसंस्था व शिक्षक देशाच्या अंतर्गत मजबुतीकरीता कार्य करतात, असेही त्यांनी सांगितले.

शोभा धारिवाल म्हणाल्या, मराठीसह इंग्रजी माध्यमाकडे आता हुजूरपागा वाटचाल करीत आहे. आताची युगाची ही गरज असून आरोग्य आणि शिक्षण या आपल्यासाठी महत्वाच्या बाबी असणे गरजेचे आहे. त्यामध्ये आमचे फाऊंडेशन काम करते. मुलींच्या शिक्षणाकरीता मदतीसाठी आम्ही कायम तत्पर आहोत, असेही त्या म्हणाल्या. दिनकर टेमकर म्हणाले, आजच्या काळात पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमाकडे आहे. त्यामुळे मुली आता हुजूरपागेसारख्या नामांकित संस्थेत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ शकतात. तसेच येथील विद्यार्थीनी जागतिक स्तरावर नाव उंचावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जयश्री बापट म्हणाल्या, तब्बल १३७ वर्षांपासून स्त्री शिक्षणाची गरज ओळखून हुजूरपागा शिक्षण देण्याचे काम करीत आहे. लोकमताच्या विरोधात जाऊन मुलींसाठी हायस्कूल सुरु करण्याचे क्रांतिकारी पाऊल तेव्हा संस्थेने उचलले होते. भारतातील हे दुसरे मुलींचे हायस्कूल आहे. हुजूरपागेने आजपर्यंत चांगले बदल स्विकारले आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा ही गरज ओळखून याची सुरुवात करीत आहोत.

रेखा पळशीकर म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रातील १३७ वर्षांचा वारसा पुढे सुरु ठेवण्याचे काम सुरु आहे. समाजसुधारकांनी आम्हाला दिलेला वारसा सांभाळणे तसेच अवघड आहे, पण आम्ही तो वारसा सुरु ठेवला आहे. आता हुजूरपागेमध्ये मराठी व इंग्रजी माध्यमाचे शिक्षण एकाच प्रांगणात मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रियदर्शनी पुरोहित यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading