ST strike : डंके की चोट पे, हे आंदोलन सुरूच ठेवणार – अॅड. गुणरत्न सदावर्ते
एसटी आंदोलनाचा नेता बदलला पण मागणी तीच
मुंबईः परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलन पुढे कायम ठेवण्यावर आंदोलक ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आज काढता पाय घेतला. त्यानंतर अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या दोघांनाही आंदोलनातून आझाद केले असे म्हणत लक्ष केले. तर आता विलीनीकरणासाठी आंदोलन ‘डंके की चोट पे’ सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
त्यामुळे आपोआपच कालपर्यंत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी नेतृत्व केलेले आंदोलन अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात सुरू राहणार हे स्पष्ट झाले. एसटी आंदोलनाचा नेता बदलला तरी विलीनीकरनाच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत.
सदावर्ते म्हणाले की, एस. टी. कामगारांची ही लोकचळवळ आहे. हा खोत-पडळकर यांनी एकट्यांनी पुकारलेला लढा नाही. कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर 70 वर्षांनी ही अभूतपूर्व लोकचळवळ सुरू आहे. सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी स्वतःसाठी या आंदोलनाला स्थगिती दिली. आम्ही विलीनीकरणासाठी डंके की चोट पे, हे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कर्मचाऱ्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
सदावर्ते म्हणाले की, आजापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या या इन्स्टिट्यूशनल मर्डर आहेत. आमचे मित्र संजय राऊत लेखनी चालवतात. त्यांनी एकदा तरी आपल्या रोखठोकमधून या संपाच्या बाजूने लिहावे, असे आवाहन त्यांनी केले. राऊत यांनी आंदोलकांच्या बाजूने भूमिका घेऊ नये, हे लज्जास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली.