जिल्ह्यातील तब्बल 800 शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत
पुणे : कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर राज्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. पण या शाळांना आता नव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विजेचे बिल न भरल्याने जिल्ह्यातील तब्बल 800 शाळांचा महावितरण कडून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तर तब्बल 128 शाळांचे मीटर काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.
पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळा-महाविद्यालये बंद होती. मात्र आता राज्य शासनाच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. शहरात 8 ते 12 वी पर्यंत तर ग्रामीण भागात 5 वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 639 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी 2847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत आहे. मात्र, जिल्ह्यातील 800 शाळा अंधारात आहेत. शाळांचे वीजबिल न भरल्याने महावितरण कडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिल न भरल्याने 792 शाळांची वीजजोडणी तोडली आहे. तर तब्बल 128 शाळांचे मीटर काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या शाळा अंधारात आहेत. वीजबील न भरल्याने जिल्हा परिषदेच्या या शाळांचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे.