Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRA

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक हा यथोचित सन्मान : शरद पवार

नाशिक : आदिवासी हा देशाचा मूळ निवासी असून त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना त्यांचे हक्क देण्याची त्याचा सन्मान देण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. या जबाबदारीतूनच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बिरसा मुंडा यांच्या स्मृतींसोबत क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय क्रांती स्मारकाच्या माध्यमातून व बाडगीच्या माचीचा सन्मान या निमित्ताने करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले आहे.

ते आज क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन व आदिवासी सांस्कृतिक महोत्सव २०२१ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ,  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,पद्मश्री राहीबाई पोपरे,आमदार हिरामण खोसकर, आमदार दौलत दरोडा, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नितीन पवार, आमदार किरण लोहमटे,आमदार सुनिल भुसारा, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार निर्मला गावित,  काशिनाथ मेंगाळ, शिवराम झोले, बिरसा बिग्रेड सह्याद्रीचे अध्यक्ष काशिनाथ कोरडे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सतिष पैंदान आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, आदिवासी बांधव हे पिढ्यान् पिढ्या देशाचे मूळ मालक आहेत. जल जमीन आणि पर्यवरणाचे रक्षण करण्याचे काम आदिवासी बांधावाकडून केले जात आहे. त्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध कार्यक्रम राबवत आहे, आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. सामाजिक परिवर्तन सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या आदिवासी बांधवांनी देशाच्या जंगल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारीही पार पाडली आहे. अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी  बांधवांना बदनाम करत आहेत, असेही यावेळी म्हणाले.

आदिवासी समाजातील इतर घटक यांच्यात अंतर ठेवण्याचे कुठलेही कारण नाही. अठरा पगड जातींना सोबत घेऊन  छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले त्यामुळेच ते रयतेच राज्य म्हटले जाते. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी जे योगदान स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिले त्याचे स्मरण व जतन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत वर्तमान व पुढच्या पिढीसाठी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading