विडंबन काव्याने रसिक झाले लोटपोट
पुणे : ‘उन्मेष ज्यांच्या यौवनाचा काहीच न झाला कमी, प्यायले जे खूप ज्यांना परि वाटे झाली कमी’, ‘वानखेडे म्हटले की आधी स्टेडीयम आठवायचे आता दाऊद आठवतो, ‘इडी पिडा टळो आणि सर्वकाही तुमच्या मनासारखे घडो…’, ‘मी म्हणालो सैराट मधल्या आर्ची सारखे बुलेट प्रेम करणार का, तर ती म्हणाली परशा सारखे विहरीत उडी मारणार का?’ अशा सामाजिक, राजकीय विषयांवर रंगलेल्या विडंबन, हास्यकाव्यातून पुणेकरांनी अनुभवली अनोख्या हास्य–काव्य मैफलीची धमाल.
निमित्त होते एरिया 37च्या वतीने आयोजित सांस्कृतिक उपक्रमांच्या शुभारंभाचे. या बहारदार कार्यक्रमाने जिंदादिल प्रेक्षकांना जणू प्रदूषण विरहित फटाक्यांच्या आतषबाजीची मजा लुटता आली. एरिया 37 क्लबचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश अय्यर यांनी या हास्यकाव्य मैफलीचे आयोजन केले होते. या निमित्ताने पुण्याच्या आग्नेय भागात अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्येष्ठ विनोदी एकपात्री कलावंत हास्यकवी बंडा जोशी, हास्यकवी भालचंद्र कोळपकर, हास्यकवी अनिल दीक्षित यांनी एकापेक्षा एक खुमासदार विनोदी काव्यरचना सादर करून मैफल रंगविली. तर या रंगलेल्या हास्यकाव्य मैफलीचे सूत्रसंचालन करताना प्रमोड आडकर यांनी आपल्या वैविध्यपूर्ण शैलीत भाऊसाहेब पाटणकर यांच्या उत्तम कविता व शायरी ऐकवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
‘निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याचसाठी शायरी सांगतो इतरांस बाबा वाचे सुखे ज्ञानेश्वरी’ या भाऊसाहेब पाटणकर यांच्या काव्यपंक्तीतील काही ओळी उद्धृत करून प्रमोद आडकर यांनी दर्दी रसिकांचे स्वागत केले.
समीक्षक बंडा जोशी यांनी आपल्या अनोख्या शैलीत या हास्य मैफलीस सुरुवात केली. मोबाईलचा अतिरेकी वापर, दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांवर टिप्पणी करीत त्यांनी अनेक किस्से सांगून उपस्थितांना खळखळून हसविले. ‘याड लागल’ या गाण्याच्या धर्तीवर अतिशय खुमासदार काव्य सादर केले. लग्न पद्धतीवर केलेले प्रहसन प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेले तर राजकीय–सामाजिक जीवनातील स्थित्यंतरावर आधारित ‘पाळणा’ या विडंबन काव्याने मैफलीत बहर आला. या काव्याला टाळ्यांच्या गजरात साथ देत रसिकांनीही मैफलीत रंग भरले.
ज्येष्ठ हास्य कवी भालचंद्र कोळपकर यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात ‘उत्स्फूर्त दाद देणे हे जाणकार रसिकतेचे लक्षण आहे, ही फक्त हास्य मैफल नाही, तुमच्या आमच्या दु:खावर मात करण्याचे हे शिक्षण आहे’, असे म्हणत केली आणि कॉलेज जीवनातील अनेक गंमतशीर प्रसंगांवर काव्य सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. ‘प्रत्येक रसिक हा मुका कवी असतो तर, प्रत्येक कवी हा बोलका रसिक असतो’ असे म्हणत त्यांनी रसिकांनाही बोलते केले. पती–पत्नीच्या नात्यातील रेशीमगाठ उलगडत सादर केलेली रचना भाव मिळवून गेली.
‘प्रेमाचा इजहार करायला वर्षातले 363 दिवस मजेचे असतात, वजा केलेले दोन दिवस रक्षाबंधन आणि भाऊबिजेचे असतात’ अशा काव्यपक्तींनी सुरुवात करून हास्यकवी अनिल दीक्षित यांनी पुणेकरांच्या रसिकतेचे कौतुक केले. ‘काळ मोठा चमत्कारिक असं काही घडवतो, पूर्वीचे सगळे संदर्भच बदलवतो, वानखेडे म्हटले की आधी स्टेडीयम आठवायचे; आता दाऊद आठवतो’ हे राजकीय प्रहसन ऐकून रसिकांमध्ये हास्याची कारंजी उडाली. गुंडप्रवृत्ती,नोटाबंदी आणि महागाईवर सादर केलेल्या विडंबन काव्याला प्रेक्षकांनी मनसोक्त दाद दिली. कलाकारांचे स्वागत सुरेश अय्यर, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी स्वागत केले.
रवींद्र धारिया यांनी मनोगत व्यक्त करून एरिया 37च्या आगामी उपक्रांना शुभेच्छा दिल्या.