आपले मंत्रिपद यांनी किरायाने दिलय – पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंवर टीका
बीड : राज्यात अतिवृष्टीमुळे इतके नुकसान झाले. राज्य सरकारची मदत आली का? पालक मंत्र्यांची मदत आली? अन् बोललंकी यांना राग येतो. तुम्ही विरोधी पक्षात असताना किती लोकांना त्रास द्यायचा. आता तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कुणाला बोलणार? आता बीड जिल्ह्याची काय अवस्था आहे? सगळंच बंद आहे, पण चालू आहे ना त्यांच. आपले मंत्रिपद यांनी किरायाने दिलय. सरकार जर असे काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही जनतेच्या हिताची काम करा आम्ही जाहीरपणे तुमचे अभिनंदन करु. पण सध्या राज्यात चाललंय काय? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. अशा लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही. आरोपींवर बोलायचं नाही. मग जाब कोणाला विचारायचा?
वेळ आलीच तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन
मी हेलिकॉप्टरमधून भगवान बाबांवर फुलं टाकत होते. तसेच, मी तुमच्या पायावरही फुलं टाकत होते. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते, तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते. आजची दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची जी परंपरा कायम ठेवण्यासाठी तुम्ही घरची पुरणपोळी सोडून इथे आले आहात. उद्या वेळ आलीच तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन अशा ग्वाही पंकाजा यांनी उपस्थितांना दिली.
12 डिसेंबरला उसतोड कामागारांशी संवाद साधणार
मी 17,18,19 दिल्लीला आहे. त्यानंतर 23, 24, 25 तारखेला मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याला आहे. नंतर 29, 30, 31 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर आहे. तर 12 डिसेंबरला ऊसतोड कामगारांच्यासोबत मी संवाद साधणार आहे. कोरोनाच्या संकटात औषध, बेड मिळत नव्हते. अशा अवस्थेत मी दौरे करून लोकांचे आरोग्य धोक्यात टाकायचं होतं का? तुमची काळजी वाटली म्हणून घरात बसले नाही तर कोविड सेंटर सुरू झालं असत. अतिवृष्टी झाली तेव्हा दौरा केला आणि दसऱ्याच्या आधी पॅकेज जाहीर करणार म्हटले होते. केल की नाही दसऱ्यापूर्वी पॅकेज जाहीर. पण केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत, असंही पंकजा म्हणाल्या.
