Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अक्षरदान प्रतिष्ठानच्या संत तुकाराम वैश्विक कथा स्पर्धेचा निकाल जाहीर

संभाजी रोडगे, सुभाष पारखी, निशा डांगे ठरले विजेते
पुणे : अक्षरदान प्रतिष्ठान आयोजित पहिल्या ‘संत तुकाराम वैश्विक कथा लेखन स्पर्धे’चा निकाल जाहीर झाला असून परभणीचे संभाजी रोडगे (इन्स्पेक्शन) प्रथम, पुण्याचे सुभाष पारखी (स्वामी आणि महाराज) द्वितीय तर यवतमाळच्या निशा डांगे (दगुड) तृतीय हे विजेते ठरले आहेत. सोलापूरचे हरिश्चंद्र पाटील (घटकेचा गाव) आणि पुण्याच्या डॉ. कौमुदी आमीन (दगडांच्या देशा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, १००१, ७०१ रुपयांची रोख रक्कम व पुस्तके, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन, तर सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
कथा स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध कथाकार अमृता देसर्डा यांनी केले. त्या म्हणाल्या, “राज्यातील खेड्यापाड्यातून अनेकांनी कथा स्पर्धेत भाग घेतला, हे विशेष. जगणं शहरी असो किंवा ग्रामीण, जगण्यातला संघर्ष, समस्या- त्यातले बारकावे टिपायचा अनेकांनी चांगला प्रयत्न केला. कल्पनारंजन आणि वास्तववाद या दोन्हींची मिसळण बहुतांश कथांमध्ये आढळून आली. अक्षरदान दिवाळी अंकाने एक चांगली कथा स्पर्धा आयोजित केली.”
“महाराष्ट्र, गोवा, बेळगाव, बडोदा, इंदौर येथून ६३ कथाकारांनी भाग घेऊन पहिल्याच स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. विजेत्या कथा अक्षरदान दिवाळी अंकातून प्रसिद्ध होतील. नवोदितांना व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होत असल्याचे समाधान आहे,” असे अक्षरदानचे संपादक मोतीराम पौळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading