महाराष्ट्र माझ्यासाठी रामासारखा; मी भरताच्या भूमिकेत – अॅड. रमाकांत खलप
पुणे – गोव्यावर महाराष्ट्राचे अनंत उपकार असून महाराष्ट्र हा गोव्याचा थोरला बंधू आहे. महाराष्ट्राच्या सहकार्यामुळे तिळाई नदीचे पाणी उत्तर गोमांतकाला मिळाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, डी. वाय. पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांचे सहकार्य आणि आशीर्वाद आपल्याला मिळाले आहेत. रामायणातील राम आणि भरत भेटीचा दाखल देऊन संपूर्ण महाराष्ट्र माझ्यासाठी रामासारखा असून मी भरताच्या भूमिकेत आहे, अशी प्रांजळ भावना माजी केंद्रिय कायदे मंत्री आणि गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केली.
अॅड. रमाकांत खलप यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पद्मश्री विखे पाटील फाउंडेशन, संवाद पुणे आणि महाराष्ट्र कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने अॅड. खलप यांच्या गौरव समारंभाचे आज आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते अॅड. खलप यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरीचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, निर्मला खलप, अशोक विखे पाटील, सचिन ईटकर. सुनील महाजन व्यासपीठावर होते. अॅड. खलप यांच्या पुण्यातील स्नेहिजनांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
अॅड. खलप यांच्यामुळे महिलांना राजकीय क्षेत्रात 33 टक्के आरक्षण मिळाले, याचा वक्त्यांनी केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून जे काम हाती घेतले आहे ते अजून पूर्ण झालेले नाही. पुण्यातून पुन्हा लोकसभेत पाठविले तर ते काम नक्कीच पूर्ण करेन, अशी मिश्किल टिप्पणी अॅड. खलप यांनी केली. माझ्या आयुष्याची जडण–घडण ही महाराष्ट्रातील साधूसंतांच्या वाङमयातून झाली आहे. आईकडून ऐकलेले मराठीतील वाङमय आणि मराठीचे भोक्ते असलेले वडिल यांच्यामुळे मला मराठीची गोडी लागली. गोवा विधासभेतील 40 पैकी 25 आमदार पाठीशी असतानाही मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, गेल्या दोन निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळेल असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले पण ते मिळाले नाही या राजकारणातील आठवणींबरोबच भविष्यातील निवडणुकीत तिकिट मिळेल की नाही याची काही कल्पना नसल्याचे अॅड. खलप यांनी मनमोकळेपणाने सांगितले. पुण्याने मला आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी दिल्या, त्यात सोनपावलाने आलेली स्नुषाही पुण्याचीच आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
बाळासोहब थोरात म्हणाले, खलप यांच्या संपर्कात आलेली व्यक्ती त्यांचीच होऊन जाते, त्यांची ओळख कधीही पुसट होत नाही. खलप यांच्या वकिलीतील सुरुवातीच्या काळातील काही आठवणी सांगून राजकीय क्षेत्रातील जीवनप्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि अॅड. खलप यांची भेट, गोव्यातील पाणीप्रश्न, त्यासाठी महाराष्ट्र राज्याने केलेले सहकार्य आणि त्यात राज्यमंत्री म्हणून देता आलेले योगदान या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.गोव्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅड. खलप यांनी पुन्हा एकदा ताकदीने राजकारणात उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करून दिल्लीतील श्रेष्ठींशी चर्चा करण्याची ग्वाही थोरात यांनी या वेळी दिली. सध्याच्या बदलत्या राजकारणातील मूल्यांवर त्यांनी भाष्य केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोवा विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत खलप यांनी पुढाकार घ्यावा, ज्यामुळे पक्षाला स्थैर्य लाभण्यास त्यांच्या राजकाणातील अनुभवांचा उपयोग होईल. खलप यांचे मराठीप्रेम, गोवा राज्यासाठी चांगले कार्य करण्याची तळमळ याचे काही दाखले त्यांनी दिले. गोव्यात त्यांना न्याय मिळाला नाही तर दिल्लीतील कारकिर्द अल्पायुषी ठरली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक विखे पाटील यांनी केले. उपस्थितांचा सत्कार अशोक विखे पाटील, सचिन ईटकर, सुनील महाजन यांनी केला. मानपत्राचे वाचन सचिन ईटकर यांनी केले. निर्मला खलप यांचा सन्मान पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. अॅड. खलप यांच्यावरील प्रभाकर ढगे संपादित गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सुनील महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
