कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोनाशी आपण ज्या जिद्दीने लढलो आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले. त्याच ईर्षेने स्वच्छ महाराष्ट्र घडविण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व सरपंचांना केले. असे काम आपण केल्यास स्वच्छतेच्या बाबतीत राज्य देशात अग्रेसर ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियान अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ‘सरपंच – पाणी व स्वच्छता संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा येथील समिती कक्षातून राज्यातील २७ हजार ८३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.
या कार्यक्रमास नाशिक येथून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार श्रीमती सरोज अहिरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते तर वर्षा येथील समिती कक्षातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन तसेच जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद उपस्थित होते. यावेळी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान काही सरपंचांनी आपले मनोगत मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केले.
‘स्वच्छता हेच अमृत‘ हा नवा मंत्र
आपण देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना स्वच्छता हेच अमृत हा नवा मंत्र आहे हे ध्यानात ठेवून काम करा. वैयक्तिक स्वच्छता असेल तर रोगराईला वाव मिळणार नाही. त्यामुळे आपले आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून हे अमृत आपण मिळवा असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.
कोरोना परिस्थिती महाराष्ट्राने उत्तमरीत्या हाताळल्याबद्धल आपल्या सर्वांचे कौतुक करण्यात आले. आम्ही दिलेल्या सूचना आपण सगळ्यांनी पाळल्या त्याचेच हे फळ आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
