हृदयविकारासाठी ताणतणाव व धावपळीची जीवनशैली कारणीभूत – डॉ.नित्यानंद ठाकूर यांचे प्रतिपादन
पुणे : हृदयरोग होऊ नये, यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहेत. योग्य आहार, व्यायाम आणि व्यसनापासून लांब राहणे या तीन गोष्टी स्वस्थ हृदयासाठी गरजेच्या आहेत. तरुणांमध्ये हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. याला धावपळीची आणि ताणतणावाची जीवनशैली कारणीभूत आहे, असे मत हृदयरोगतज्ञ डॉ. नित्यानंद ठाकूर यांनी व्यक्त केले.
नित्यश्रद्धा प्रतिष्ठान आणि नित्यश्रद्धा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोगासंबंधी पुणे स्टेशन येथील प्रतिष्ठानच्या सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयातील हॉर्ट फेल्युअर क्लिनिक आणि ओर्टो क्लिनिकचे देखील उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नित्यश्रद्धा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक हृदयरोगतज्ञ डॉ. नित्यानंद ठाकूर उपस्थित होते.
डॉ.नित्यानंद ठाकूर म्हणाले, हृदय रोग म्हटले की आपल्यामध्ये एक भितीचे वातावरण निर्माण होते. परंतु हृदयासंबंधी कोणताही आजार असल्यास घाबरुन जाण्याची गरज नाही. प्रतिबंधात्मक उपचार घेतल्यास हृदयरोगावर मात करता येईल. पाश्चात्य देशात ज्या पद्धतीने उपचार पद्धती मिळतात, त्याचप्रकारे उपचार पद्धती भारतात आणि आता पुण्यात देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे आता रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहेत.
ते पुढे म्हणाले, भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, त्यामुळे भारताला डायबेटीक कॅपिटल आॅफ वर्ल्ड म्हटले जाते, त्याचप्रकारे हृदयरोगाचे देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात भारतात आढळतात. त्यामुळे ह्रदयरोगावर मात करण्याकरीता आहार व जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
