भारतीय किसान संघाचे 30 सप्टेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालया येथे धरणे आंदोलन
पुणे: सद्यस्थितीत महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी ‘न भूतो’ अशा आर्थिक संकटातून जात आहे. त्यासाठी भारतीय किसान संघाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वतोपरी सोडवण्यासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रामध्ये ऊस हे एक प्रमुख नगदी पीक शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा आधार म्हणून स्थापित झाले आहे. म्हणून भारतीय किसान संघाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10. 30 वाजता साखर आयुक्त, शिवाजीनगर, पुणे येथे महाराष्ट्र राज्यातील सर्व ऊस उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी धरणे आंदोलन करणार आहेत अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत भारतीय किसान संघाचे प्रात संघटन मंत्री चंदन पाटील यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला माऊली तुपे, बबन राव केजळे उपस्थित होते.
चंदन पाटील म्हणाले, शासनाने शेतकरी, साखर उद्योजक व ग्राहक यासर्वांचा समन्वित विचार करून उपाययोजना करावी, अशी किसान संघाची भूमिका आहे. यासाठी भारतीय किसान संघाने सातत्याने या तीनही घटकांना एकत्र करून ‘ऊस परिषदा’ आयोजित केल्या आहेत. या परिषदांमध्ये झालेले प्रस्ताव शासनाला पाठवले आहेत. परंतु, शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गृहित धरून केवळ साखर कारखानदारांच्या हिताचा विचार केला आहे. हे कितपत योग्य आहे? किसान संघाचे याबाबत ठाम म्हणणे आहे की, हा सर्व ऊस उत्पादकांवर घोर अन्याय आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने धोरणांमध्ये व निर्णयांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. असे आवाहन चंदन पाटील यांनी केले.
