ओबीसी आरक्षण : आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार – नाना पटोले
नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका करीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार आहे, असा आरोप आज पत्रकार परिषदेत केला. तसेच केंद्र सरकारने तातडीने इम्पिरिकल डेटा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
पटोले म्हणाले, राज्य सरकारने मागास आयोग तयार करावा. त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार करावा आणि पुन्हा कोर्टात यावे, असा सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याकडील डेटा आम्हाला द्यावा. तो कोर्टात दिल्यास ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मागास आयोग डेटा गोळा करण्याचं काम करणार आहे. केंद्र सरकारने सांगितले आहे की आम्ही जाती निहाय जनगणना करणार नाही. त्यामुळे आयोगाने डाटा गोळा करण्यासाठी 450 कोटी रुपये मागितले आहेत. ओबीसींना आरक्षण न देण्याची राज्य सरकारची भूमिका नसती तर आयोग बसविला नसता, असेही त्यांनी सांगितले.
ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. भाजपने नेहमीच ओबीसींवर अन्याय केला आहे. मागासवर्गीय मराठा असो किंवा इतर जातींना भाजपला आरक्षण द्यायचंच नाहीये. त्यामुळं ते अडचणी आणत आहेत. ज्यांनी आरक्षण संपवलं तेच म्हणतात नेत्यांना फिरू देणार नाही, अशी टीका त्यांनी केली. ओबीसींवर भाजप सतत अन्याय करत आहे. ओबीसी नेत्यांवर आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम करत आहे. मागच्या सरकारच्या काळातही आशुतोष कुंभकोणीं हे अॅडव्होकेट जनरल होते आणि याही सरकारच्या काळात तेच आहेत, सातत्यानं ते केस हरत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही तपासून बघण्यात येईल,असेही त्यांनी म्हंटले आहे.