निखळ आनंद देणे हे साहित्याचे अस्सल मुल्यः-प्रा. मिलींद जोशी
पुणेः- जीवनात गंभीरता जीतकी आवश्यक आहे. तितकाच विनोद देखील आवश्यक आहे. जीवनातली सहजता, निखळता आपण हरवून चाललो आहोत की काय अशी शंका येते असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्य़ाध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केले.
दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि लेखक राजीव बर्वे लिखीत मनमोकळं या विनोदी कथा संग्रह पुस्तकाचे जोशी यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्य़क्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक विचारवंत भारत सासणे हे उपस्थित होते.
प्रा. मिलींद जोशी म्हणाले, सर्वसाधारण पणे साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेत भाषिक जडत्व किंवा अलंकारीत भाषा असली की ते अभिजात साहित्य असे मानले जाते. अभिजात साहित्याची ही व्याख्या नसून ज्या साहित्यात लेखक त्याच्या अनुभवांमध्ये वाचकांला देखील सामावून घेतो तेच अभिजात साहित्य म्हणटले पाहिजे.आपण समकालीन आहोत हे दाखविण्याच्या घाईगर्दीत नवोदीत हाैशी लेखक मिळेल त्या विषयावर लेखन करण्याचा हट्टाहास करतात. हा हट्टहास करतांना आपण जे मुखवटे घालून उगाचच अविर्भाव आणून लेखन करीत असतो अशा लिखानातून अस्सलता निसटते. ओंजळूतीन निसटून गेलेले जीवनातले साधे-सरळ अनुभवांवरच आधारीत खरे साहित्य वाचकांच्या मनाला साद घालते. श्रेष्ठ कलाकृतीही जीवनातल्या साध्या सरळ अनुभवातूनच जन्माला येत असते. विनोदी लेखन करणे ही खरी तर कसोटीच असते.
भारत सासणे म्हणाले, हतबलता हा काळाचा प्रवाह आहे. कोरोना महामारी मुळे झालेले सूक्ष्म बदल हे अनामिक भितीने ग्रासलेले आहेत. महामारीचा या प्रसंगाला मानवजातीला पहिल्यांदाच सामोरे जावे लागते आहे असे नाही शंभर वर्षांपूर्वी पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. लोक रस्त्यावर मरुन पडत होती. यासाथीच्या रोगावर ब्रिटिशांनी केलेल्या उपायांच्या नोंदी आठवतात परंतू त्या नोंदीमध्ये समाज मानस शास्त्रीय नोंदी आढळत नाहीत. तंत्रयुग, अवकाशयुग, अणुयुग असा प्रवास करीत मुनुष्य प्राणी आता भ्रम युगात आलेला आहे. या युगात सर्वसामान्य मनुष्य भ्रमिष्ठ झालेला आहे.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात मनमोकळ ह्या या विनोदी कथा संग्रह पुस्तकातील दोन कथांतील काही निवडक भागाचे अभिवाचन करण्यात आले. त्यात अविनाश ओगले, सुदीप बर्वे, प्रसन्न जोगदेव आणि सुनीता ओगले यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मधुर बर्वे यांनी केले तर आभार मधुमिता बर्वे यांनी मानले.