आंबिल ओढा सरळीकरणाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन…
पुणे: पुणे महानगरपालिकाच्या माध्यमातून आंबील ओढा सरळीकरण विषय सध्या गाजत आहे, पण हा विषय खूप गंभीर असून ओढा सरळ केल्याने २१४ दांडेकर पूल, १३० दांडेकर पूल झोपडपट्टी, ९९९ दत्तवाडी, १२८ हनुमान नगर , फाळके प्लॉट दत्तवाडी, १००४/०५ राजेंद्र नगर झोपडपट्टी व विवेक श्री सोसायटी, श्यामसुंदर गोकुळ वृंदावन सोसायटी, फाटक बाग, आनंद बाग हा सर्व भाग पाण्याखाली १०० टक्के जाऊन जीवित व वित्त हानी होऊ शकते. आंबील ओढ्याचा इतिहास पाहता पुर्वीच्या महापूर घटनेने महाराष्ट्र हादरवला होता. दांडेकर पूल भागापासून पुढचा भाग हा उताराचा असून सखल आहे त्यातच ओढा सरळ झाल्यास पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढून पूरपरिस्थिती निर्माण होउ शकते म्हणून स्थानिक रहिवासियांनी विरोध केला आहे. यासंबधीचे पत्र आंबिल ओढा बचाव कृती समितीने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना दिले. मात्र प्रशासन अजूनही तुघलकी पद्धतीने मनमानी कारभार करत आहे त्यामुळे आंबिल ओढा सरळीकरणाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आल्याची माहिती बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी दिली.
या आंदोलनावेळी आंबिल ओढा बचाव कृती समिती, नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.