रविंद्रनाथ टागोर यांनी देशाला जन-गण-मन हे राष्ट्रगीत दिले – रत्नाकर महाजन
पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘‘व्यर्थ न हो बलिदान’’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत आज नोबेल पुरस्कारार्थी, ज्येष्ठ कवी व स्वातंत्र्य सेनानी रविंद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे व्याख्यान काँग्रेस भवन येथे आयोजित केले.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेविका लता राजगुरू, रमेश अय्यर, सचिन आडेकर, द. स. पोळेकर, चैतन्य पुरंदरे, भगवान कडू, ॲड. बाळासाहेब बाणखेले, राजेंद्र नखाते, दिलीप लोळगे, मीरा शिंदे, ज्ञानेश्वर निम्हण व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले, ‘‘बंगालच्या भूमीमध्ये जन्माला येऊन समाजकार्यामध्ये आपले पूर्ण आयुष्य गेले. रविंद्रनाथ टागोर हे ज्येष्ठ कवी, लेखक, साहित्यिक व स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी लिहीलेली काबुलीवाला कादंबरी जगप्रसिध्द झाली. १७ फेब्रुवारी १९१५ साली महात्मा गांधी रविंद्रनाथ टागोरांना कलकत्त्याला भेटायला गेले होते. महात्मा गांधीनीं टागोरांना आपले थोरले भाऊ मानले होते आणि टागोर यांनी गांधींना ‘‘महात्मा’’ हे नाव दिले. १९१९ ला झालेल्या जालियनवाला बाग घटनेनंतर टागोरांनी ब्रिटीश सरकारवर जोरदार टीका केली. १९३२ साली महात्मा गांधी यांनी मीठाचा सत्याग्रह सुरू केला त्यावेळी टागोर महात्मा गांधींना भेटायला साबरमती आश्रमात गेले. आणि त्यांच्या सत्याग्रहाचे समर्थन केले. त्यावेळी ते म्हणाले ब्रिटिशांच्या नशिबाच्या चक्राने त्यांचे साम्राज्य संपणार आहे. त्यांनी जन-गण-मन हे राष्ट्रगीत आधी बंगालीमध्ये लिहिले. हे राष्ट्रगीत रविंद्रनाथ टागोर यांची पांचछंद कविता ‘भारत भाग्यो विधाता’ या पहिल्या श्लोकवरून घेलेले आहे. २४ जानेवार १९५० साली त्यांनी लिहिलेले हे राष्ट्रगीत भारत सरकारने अधिकृत केले.’’
रमेश बागवे म्हणाले की, ‘‘ज्येष्ठ कवी व स्वातंत्र्य सेनानी रविंद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा राष्ट्रगीत २७ डिसेंबर १९११ साली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कोलकत्ता अधिवेशनामध्ये गायले होते. जन-गण-मन राष्ट्रगीत भारत देशाची सांस्कृतिक, भौगोलिक व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतिक आहे. ’’