राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल, तर पुण्यासह ‘या’ आकरा जिल्ह्यांना दिलासा नाही
मुंबई – राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता, ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी वारंवार केली जात होती. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम असणार आहे. यामध्ये पुणे आणि रायगडसह 11 जिल्ह्यांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. निर्बंध कायम असलेले अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत. सिनेमा गृह आणि मॉल मधील कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण करून चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असही टोपे यांनी सांगितले. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट हा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथील दुकानांमध्ये वेळेत वाढ, तसेच उपाहारगृहांच्या वेळेत वाढ केली जाऊ शकते.
या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार
पश्चिम महाराष्ट्र – पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर
कोकण – रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर
मराठवाडा – बीड
उत्तर महाराष्ट्र – अहमदनगर
या 15 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट एक टक्क्यापेक्षा कमी
राज्यात मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट हा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामध्ये माराठवाड्यातील परभणी,नांदेड, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये तर अमरावती, वाशिम, वर्धा, नंदुरबार, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि नागपूरचा यामध्ये समावेश आहे. तसेच बुलडाणा, धुळे या जिल्ह्यांमध्ये देखील पॉझिटिव्हीटी रेट हा एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
