तातडीने शैक्षणिक शुल्क निश्चित न केल्यास पालकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल – माधव भांडारी
पुणे: ठाकरे सरकारच्या वेळ काढू आणि बेपर्वा धोरणामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा पुरता बोजवारा वाजला आहे. शैक्षणिक शुल्क निश्चितीचा प्रस्ताव राज्य सरकारने खुंटीवर टांनगल्यामुळे हजारो पालक व विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे. याबाबत ठाकरे सरकारने तातडीने शैक्षणिक शुल्क निश्चित न केल्यास पालकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
गेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्यानंतर यंदाही ऑनलाईन शाळा सुरू असतानाही शाळांकडून सक्तीने जबर फी आकारणी केली जात असल्याने हजारो कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोनामुळे उत्पन्न घटले असतानाच शाळांच्या मनमानी मुभा देऊन ठाकरे सरकार सामान्य माणसाची लुबाडणूक करण्यास थेट हातभार लावत आहे. एकतर शैक्षणिक वर्ग सुरू नसल्याने शाळांच्या आस्थापना खर्चात मोठी बचत झाली आहे दुसरीकडे पालकांना मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी संगणक इंटरनेट सुविधांच्या वाढत्या खर्चांचे नवे ओझे पेलावे लागत आहे.
कोरोना चे कारण देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारच्या विरोधातील असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट न पाहता तातडीने भरमसाठ फी आकारणीला चाप लावून शिक्षणव्यवस्था रुळावर आणावी अशी मागणी माधव भांडारी यांनी केली आहे.
शाळा बंद असल्यामुळे शाळांमध्ये सुविधा विद्यार्थी वापरत नाहीत त्यांचे शुल्क आकारू नये असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही राज्यातील अनेक शिक्षण संस्था संपूर्ण फी एकर कमी भरण्याची सक्ती पालकांवर करत असल्याच्या तक्रारी आहेत न भरल्यास ऑनलाईन वर्गात प्रवेश दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून विद्यार्थी वंचित राहणार असून यासाठी राज्य सरकार जबाबदार राहील असा इशाराही भांडारी यांनी दिला.
आमदारांच्या निलंबना विरोधात कोर्टात जाणार
दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने जे आमच्या 12 आमदाराचे निलंबन केले. त्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत, असे माधव भांडारी यांनी यावेळी सांगितले. तसेच विधानसभेत जो प्रकार घडला त्यात आमच्या आमदारांची काही चूक नाही. आम्ही आमच्या आमदारांना न्याय मिळवून देणार आहोत असेही भांडारी म्हणाले.
