Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मानखुर्द घरकुल घोटाळा, पोलिसांकडून आरोपींना अभय, दोन वर्षानंतरही एकही आरोपीला अटक नाही

मुंबई : मानखुर्द येथील शिवशाही पुनर्वसन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घरकुल घोटाळा झाला असून हजारो लोकांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाला दोन वर्ष उलटूनही पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. दोन वर्षात चार तपास अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्याने या प्रकरणात पोलिसच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

चुनाभट्टी, महात्मा जोतिबा नगर या ठिकाणी मधुकर कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बोगस सर्वे करून शासनाकडून ११५४ सदनिका मिळवल्या. विस्थापितांचे पुनर्वसन करण्याच्या नावाखाली घेतलेली घरे हे जादा पैसे आकारून बाहेरील व्यक्तींना विकण्यात आली. शिवाय विकतांना हे मूळ झोपडपट्टी धारक असल्याचे खोटे दस्तऐवज बनविण्यात आले. त्यानंतर कोणत्याही प्रकारची शासकीय नोंदणी न करता साध्या नोटरीवर या घरांची विक्री करण्यात आली. या घोटाळ्या नंतर आणखीन अडीच हजार लोकांना घरे मिळवून देतो असे सांगून मधुकर कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शंभर कोटींहून अधिक रक्कम जमा करून त्याचा अपहार केला. याबाबत पत्रकार सुरेश नंदिरे यांनी १७०/१९ भादवि ४२०,३४ नुसार ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धायगुडे यांची तात्काळ बदली करण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवासे यांनी सहा महिने तपास केल्यानंतर आरोपींना दोनच दिवसात अटक केली जाईल असे सांगितले. त्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक कदम यांच्याकडे हा तपास देण्यात आला. मात्र काही महिन्यातच त्यांचीही बदली करून हा तपास सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत हुंबे यांच्याकडे देण्यात आला. तपास शेवटच्या टप्प्यात आलेला असतानाच आरोपींना अटक करण्यापूर्वीच हुंबे यांची रातोरात सायबर क्राइमला बदली करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बाबर यांच्याकडे तपास देण्यात आला. गेल्या महिन्याभरापासून या प्रकरणाची फाइल पोलीस उपायुक्त उपाध्याय यांच्याकडे सहीसाठी पडलेली असून आता या प्रकरणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकरणात ७०हून अधिक तक्रारी दाखल असूनही ट्रॉम्बे पोलीस आरोपींना अटक करायला तयार नाही.

या प्रकरणात पोलिसांनी काय तपास केला. याची माहिती ही तक्रारदारांना दिली जात नसून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. झोन सहाचे पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही या प्रकरणात पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. हजारो लोकांचे कोट्यावधी रुपये अडकलेले असताना ही शिवाय हजारो बोगस लोकांना घरे दिलेली असतानाही पोलीस मात्र काहीच कारवाई करीत नसल्याने आता पोलिसांवर संशय निर्माण होत आहे. या प्रकरणात एका बड्या राजकीय नेत्याला वाचवण्याचा तर पोलीस प्रयत्न करीत नाहीत ना असा संशय आता निर्माण होत आहे. त्यामुळे येत्या पाच जुलै रोजी विधान भवनावर थेट मोर्चा नेणार असून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading