पुणे, नाशिकसह कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता
पुणे: मागील तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा खोळंबा झाला आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दिमाखात आगमन केलेल्या पावसानं (Monsoon Rain) मागील वीस दिवसांपासून राज्यात दडी मारली आहे.
दरम्यानच्या काळात राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यात अजूनही अपेक्षेप्रमाणे मान्सून सक्रिय झाला नाही.
यानंतर आज पुन्हा राज्यात मान्सूननं दडी मारली आहे. आज राज्यात पश्चिम किनारपट्टी वगळता सर्वत्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे.पुढील पाच दिवस राज्यात अशीच स्थिती असणार आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यानं याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. तर उद्या भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.
याशिवाय आज घाट परिसरातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वेगवान वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर आज मुंबईतही कोरड्या हवामानाची नोंद झाली आहे. याठिकाणी काही भागात अंशत: ढगाळ वातावरण आहे. पण आज मुंबईत पावसाची शक्यता जवळपास नाही.असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
