Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेत सहभाग घेत तरुणाईने केली होळी

पुणे : अंमली पदार्थांच्या विळख्यात सहजपणे फसते ती तरुणाई. त्याचा प्रसार रोखला नाही तर अख्खी पिढी उद्ध्वस्त होते. त्यामुळे समाजात अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जागृती करण्यासाठी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त तरुणाईने एकत्र येत अमली पदार्थांची प्रतिकात्मक पुतळ््याची होळी केली. यावेळी त्यांनी से नो ड्रग्सचा संदेशही दिला.

आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, भाजपा एनजीओ आघाडी व मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्सच्यावतीने जागतिक अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, स्वरदा बापट, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, निलेश कांबळे, जेरी कोरीया, संजय हिरवे, शशिकांत कुलकर्णी, जयपाल पाटील, धनंजय मराठे, गणेश इरला, सुबोध उत्तेकर, अमित शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या कर्मचाºयांसाठी लसीकरण ड्राइव्हची देखील व्यवस्था करण्यात आली.

सिध्दार्थ शिरोळे म्हणाले, दारूमुळे शारिरीक त्रास होणे हे व्यसनाचे अत्यंत साधारण रूप झाले आहे. आज याहीपेक्षा भयंकर व्यसनाच्या विळख्यात तरुणाई अडकत आहे. व्यसन लागणाºया गोष्टींची हल्ली सहज उपलब्धता होते, त्यामुळे त्याचा वापर सर्रास होत असल्यामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आरोग्यदायी आयुष्य हा साधा सरळ विचार आहे, परंतु अंमली पदार्थांचे व्यसन हा आकर्षणाचा विषय आहे. ते आकर्षण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

स्वरदा बापट म्हणाल्या, तरुणाईचे शिक्षणासाठी शहराकडे येण्याचे प्रमाण जास्त असते. इथे आल्यानंतर झगमगत्या दुनियेकडे आकर्षीत होतात आणि हळूहळू व्यसन करू लागतात. व्यसनाचे प्रमाण इतके वाढत की ते संपूर्ण त्याच्या आहारी जातात. तरुणाईचे व्यसनाधीन होण्याचे प्रमाण जसे वाढत आहे त्याचबरोबर व्यसनांमुळे आत्महत्याचे प्रमाण देखील वाढत आहे. हे रोखण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे.

डॉ. अजय दुधाणे म्हणाले, गेल्या काही वर्षात अमली पदार्थ व्यसनांची दाहकता इतकी वाढली की, समउपदेशनाची सुरूवातही १४ ते १५ वयोगटातील मुलांपासून सुरू झाली आहे. त्याचबरोबर व्यसन करण्याचे विविध प्रकार देखील समोर येत आहेत. पुण्यातील तरुणाईमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत आहेच, त्याचबरोबर महिलांचे प्रमाण देखील वाढत आहे. तरुणाईला व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading