विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचे
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवस होणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे हे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे येत्या ५ आणि ६ जुलैला होणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कमीत १५ दिवसांचं तरी घेण्यात यावं, अशी मागणी विरोधक करत होते. मात्र, सरकारने केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आल्या आहेत. दरम्यान, दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपाने बैठकीतून बहिष्कार टाकत सभात्याग केला.