कारभारी लयभारी…! – आता वीरू उतरणार राजकारणात
राजकारणावर बेतलेल्या कारभारी लयभारी मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात घर केल आहे. “डोळ्यात जाळ हाय, दुश्मनाचा काळ हाय काळीज कापतंय नजरेची सूरी, आला आला कारभारी लयभारी…!” हे गाणं विशेष गाजलं. या मालिकेच्या निमित्ताने निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेची कथा तेजपाल वाघ यांची असून विशाल कदम यांनी संवाद लेखन केले आहे. तर पटकथा स्वप्नील गांगुर्डे याची आहे.
मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि, राजवीरचे वडील जसे त्या गावचे कारभारी होते आणि त्यांचा पक्षात, राजकारणात आणि विरोधकांसमोर एक दरारा होता त्याच प्रमाणे राजवीरने सुद्धा गावच्या भल्यासाठी सक्रिय राजकारणात काम कराव. यासाठी पियू वीरूच नाव आमदारकीच्या निवडणुकीसाठी पुढे करते पण वीरू काकीमुळे या निवडणुकीतून माघार घेण्याचं ठरवतो. पण आता काकीचा खोटारडेपणा वीरूच्या समोर येणार असून काकीला धडा शिकवण्यासाठी तो आता या निवडणुकीला उभा राहणार आहे. काकी या अपमानाचा बदल कसा घेणार? राजकारणातला राजवीरचा हा प्रवेश त्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
‘वीरू’ या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेता निखिल चव्हाण म्हणाला, “वीरू त्याच्या काकीला खूप मानतो आणि त्यांचा कुठलाच शब्द तो खाली पडू देत नाही. पण खोटारडेपणा वीरूला अजिबात आवडत नाही आणि आता काकीचा खोटारडेपणा त्याचा समोर आल्यामुळे वीरू त्यांच्या नाकावर टिचून राजकारणात उतरणार आहे. आता मालिका अजून उत्कंठावर्धक होणार असून मी राजकारण्याची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
