राज्यात पुन्हा कठोर निर्बंध? मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे मोठे विधान
पुणे – राज्यात कोरोनाच्या निर्बंधामध्ये नवे धोरण अवलंबल्यामुळे कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात रुग्णसंख्या वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर पावले टाकणार असल्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात राज्याचे मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (रविवार) पुण्यात बोलताना महत्त्वाचे विधान केले.
विजय वडेट्टीवर म्हणाले, कालची आकडेवारी पाहिली तर नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तरी देखील आजच यावर ठोस भाष्य करता येणार नाही. पुढील आठ दिवसांच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर ही परिस्थिती आहे. अशीच रुग्णसंख्या वाढली तर मात्र एकंदर स्थितीचा आढावा घेऊन अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढील आठ दिवसांनंतर यासंदर्भात पुढील पाऊल उचलले जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या आत आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बहुतांश व्यवहार सुरु झाले आहेत.
व्यवहार सुरु झाल्याने गर्दी होण्याचे प्रमाण वाढत आहेत. याचा परिणाम रुग्ण संख्या वाढीवर होत आहे. यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली असून निर्बंधाबाबत नव्याने विचार सुरु करण्यात आल्याचेच विजय वडेट्टीवार यांच्या विधानावरुन दिसून येत आहे.
