मोदी सरकारने ७ वर्षात न केला विकास पण देश केला भकास – रमेश बागवे
पुणे – केंद्रातील मोदी सरकारला आज ७ वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या ७ वर्षाच्या अपयशी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आज राज्यात सर्व ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. निदर्शनाच्या ठिकाणी मोदी सरकारच्या ७ प्रमुख अपयशाचे मुद्दे व प्रतिकात्मक ७ पुतळे तयार करून त्यातील प्रत्येक पुतळ्यावर काळ्या रंगाचा मुखवटा लावण्यात आला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकारने ७ वर्षात जनतेची पिळवणूक केली आहे. अच्छे दिनचे स्वप्न व १५ लाखाचे अमिष दाखवून या जुमला सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. पंतप्रधान मोदींनी नोटबंदी करताना सांगितले की नोटबंदीमुळे भ्रष्टाचार थांबेल, पैशाचा काळाबाजाराला आळा बसेल व देशातील दहशतवाद संपुष्टात येईल. वास्तविक पाहता असे काही झाले नाही. याउलट देशाची अर्थ व्यवस्था ढासळली. गेल्या ७ वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत मोदी सरकारने दोनंदा डल्ला मारला. जीवनावश्यक वस्तूंची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसचे दराने उच्चांक गाठला आहे.
सुरूवातीपासूनच कोरोना संसर्ग रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. त्यांच्या गाफिलपणामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. शेतकरी संघटनेशी कुठलीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्या विरोधी काळे कायदे केले. गेली अनेक महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ आंदोलने करीत आहेत परंतु पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून हुकूमशाही पध्दतीने नवीन शेतकरी कायद्याची अमंलबजावणी करीत आहे. देशाच्या १३० कोटी जनतेच्या लसीकरणाचे नियोजन न करता जगात आपले नावलौकिक करण्यासाठी ९३ छोट्या देशाला लस पुरविली. परीणाम आज देशाच्या जनतेला पुरेशी लस उपलब्ध नाही. ‘मोदी सरकारने ७ वर्षात न केला विकास पण देश केला भकास’’.
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘की गेल्या ७ वर्षात मोदी सरकारने जनतेची अपेक्षा भंग केली. खोट बोला पण रेटून बोला हा मंत्र मोदी सरकार अतिशय प्रामाणिकपणे राबवित आहे. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण दिशाहीन आहे. त्यांच्या चूकीच्या धोरणामुळे आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की झाली आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत प्रचार करताना मोदी म्हणाले होते की भाजप जर सत्तेवर आले तर दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देणार. भाजप सरकार सत्तेवर आले परंतु रोजगार देण्याऐवजी युवा पिढी बेरोजगार झाली. मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सप्ने’’ आहे. फक्त आपल्या २ उद्योगपती मित्रांचीच संपत्ती वाढविली. मोदींनी आपल्या उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला आहे. रेल्वे, विमानतळे, बंदरे, बी.एस.एन.एल., पेट्रोलियम कंपन्या, बँका अशा सरकारी आस्थापना विकायला काढल्या आहेत ज्या जनतेची संपत्ती आहे.’’
या आंदोलनात बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, आबा बागुल, सचिन साठे, रत्नाकर महाजन, अरविंद शिंदे, प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, अविनाश बागवे, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर, संगिता तिवारी, रफिक शेख, सुजाता शेट्टी, बाळासाहेब दाभेकर, सुनिल शिंदे, राजेंद्र शिरसाट, प्रकाश पवार, राजू साठे, विशाल मलके, यासीन शेख, मनोहर गाडेकर, मेहबुब नदाफ, विठ्ठल गायकवाड, प्रशांत सुरसे, चेतन आगरवाल, भारत सुराणा, अरूण गायकवाड, मुन्नाभाई शेख, क्लेमेंट लाजरस, रॉर्बट डेव्हिड आदी सहभागी झाले होते.
