अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर – किरिट सोमय्यांचा दावा
सोलापूर – माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यानंतर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सचिन वाझे प्रकरणामुळे अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली. तसेच, या प्रकरणात पाच अधिकारी निलंबितही करण्यात आले. आता सध्या अनिल परबांचा नंबर असून त्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नंबर असेल असा दावा सोमय्यांनी केला. भाजप उद्धव ठाकरे सरकारमधला भ्रष्टाचार पूर्णपणे बाहेर काढेल, असंही सोमय्या म्हणाले. राज्यातील सरकारनं खुशाल पाच वर्षे पूर्ण करावी. पण मंत्री आणि नेत्यांकडून होणारे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करणार असल्याचं सोमय्या म्हणाले.
यावेळी सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांना 55 लाख रुपये परत करावे लागले आहेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरएचे गाळे ढापल्याचं हायकोर्टात सिद्ध झालं आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड आता रांगेत आहेत. त्यामुळं ‘आगे आगे देखो होता हैं क्या’ असं म्हणत सोमय्यांनी संकेत दिले.
कोरोना लसीकरणावरून मुंबईमध्ये काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्धव ठाकरे सरकारमुळं झालेल्या कोविड हत्याकांडावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस हे आंदोलन करत असल्याची टीकाही किरीट सोमय्या यांनी केलीय. एप्रिल महिन्यात जे मृत्युकांड महाराष्ट्रात झालं आहे त्याचा आणि लस चा काय संबंध आहे असा प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केलाय. भाजप भविष्यात महाराष्ट्रातील कोविड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणारं असल्याचंही सोमय्या म्हणाले. तसंच 31 डिसेंबर पर्यंत प्रत्येक भारतीयाचं लसीकरण झालेलं असेल असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.