राज्यात 1 जून पासून लॉकडाऊन सरसकट उठवला जाणार नाही – राजेश टोपे
मुंबई – राज्यातील लॉकडाऊन आणखी वाढणार की नियमांमध्ये शिथिलता येणार याबाबत अद्यापही निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र, लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही. याबाबचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, लॉकडाऊनमधून सूट देताना ती 3-4 टप्प्यांत दिली जाईल. रेड झोनमधील गावांबाबत सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. ज्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी, असा विचार आहे. तसेच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा सरकारचा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत तौते वादळासह पदोन्नती आरक्षणावरही चर्चा झाली. मात्र, या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
