उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीसांशी रत्नागिरीत गुप्त भेट
सिंधुदुर्ग – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून विरोधकांकडून त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आता शिवसेना नेते, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
‘तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. त्या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली’, असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे आता ही भेट नक्की झाली का, झाली असेल तर भेटीमागचं कारण काय, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी रत्नागिरीत जाण्याचे कारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.