अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ता म्हणजे बाहरी मल्होत्रा
श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
पुणेः- एकाचवेळी अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार करून बाहरी मल्होत्रा यांनी जीवनाचे अतिशय योग्य संतुलन राखले. एका यशस्वी उद्योजकाबरोबरच त्यांनी संतुलित जीवनाचा आदर्श घालून दिला होता. अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्वात होता, अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विकफिल्ड उद्योगसमुहाचे प्रमुख बाहरी मल्होत्रा यांना श्रद्धांजली अर्पण केली. बाहरी मल्होत्रा यांचे नुकतेच निधन झाले. पुणयातील जनसेवा फाैंऊडेशन बरोबर बाहरी मल्होत्रा यांचे विशेष ऋणानुबंध होते. फाैंऊडेशनतर्फे आयोजीत श्रद्धांजली सभेत बाहरी मल्होत्रा यांच्या विषयी समजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.
डाॅ. विनोद शहा म्हणाले की, बहारी मल्होत्रा यांच्यात परमेश्वरी अंश होता. आमच्या वरचेवर भेटी व्हायच्या. त्यांना भेटल्यानंतर ताकद आणि ऊर्जा मिळायची. विकफिल्ड उद्योग समूह नावारुपास आणून त्यांनी त्यांच्यातील नेतृत्व गुण सिद्ध केले होते. मल्होत्रा फाैउंडेशन असो किंवा जनसेवा फाैऊंडेशन अशा विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाज उत्थानासाठी कार्य केले. ते तरुणांचे प्रेरणास्त्रोत होते. जनसेवा फाैऊंडेशन कडून हाती घेण्यात आलेल्या टाॅयलेट आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी ह्या दोन्ही प्रकल्पांना त्यांनी भरभरून मदत केली आणि सक्रिय सहभाग नोंदवला.
डाॅ. विजय भटकर म्हणाले की, मानवी जीवन हे खूप माैल्यवान आहे आणि ते कसे जगले पाहिजे याचा वस्तुपाठ बाहरी मल्होत्रा यांनी घालून दिला होता. अध्यात्माचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. ते सच्चे राष्ट्रभक्त होते. राष्ट्रउभारणीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करुन घेता येईल या बाबत ते आग्रही असायचे.
डॉ. शा ब. मुजुमदार म्हणाले की, माझी आणि बाहरी मल्होत्रा यांची 1972 पासून मैत्री होती. दिवाळीच्या काळात ते माझ्या महाविद्यालयातील बाहेरील देशांतील विद्यार्थांना दिवाळीसाठी खास आमंत्रित करीत असत. फ्रिडम फ्रॉम हंगर हा त्यांचा ध्यास होता. ही शोकसभा नसून ही स्मृतीसभा आहे असे मी मानतो.
डाॅ. नरेंद्र जाधव म्हणाले की, बाहरी मल्होत्रा हे उमदे आणि स्नेहशील व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या स्वभावात विलक्षण गोडवा आणि विलोभियनता होती. उद्योजक या नात्याने जगातले सर्व बरे वाईट अनुभव त्यांना आले होते. परंतू त्यांनी आपल्या मनाची निर्मळता कधीच सोडली नाही.
