माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणखी अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर आता सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीनेदेखील गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीआयकडे देशमुख यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने देशमुखांशी संबधित राज्यातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. हे प्रकरण आर्थिक गुन्ह्यांशी निगडित असल्यामुळे आता अंमलबजावणी संचालनालयानेही देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. न्यायधीश एस.एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे याच आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
