हिंदू-मुस्लिम मृत व अस्थिंवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांना राजपुत समाजाचा सलाम
पुणे : कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतांवर अंत्यसंस्कार व अस्थि विसर्जन करणा-या योद्ध्यांचा महाराणा प्रताप जयंतीनिमित्त सन्मान करण्यात आला. संगम पूलाखाली असलेल्या घाटावर विनामूल्य अस्थिविसर्जन करणा-या बापू तिकोने, जगन तिकोने, जीवरक्षक राजेश काची आणि कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करणा-या जावेद खान यांच्यातील माणुसकी व कर्तव्याला राजपूत समाजातील बांधवांनी सलाम केला.
समस्त राजपुत समाज अंकित राजपुत सोशल वॉरिअर्स या संस्थेने महाराणा प्रताप यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त उत्सवाचा खर्च टाळून योद्ध्यांचा सन्मान, १ हजार आॅक्सिजन पोर्टेबल कॅन सिलेंडर, धान्य मदत व आरोग्य सेवा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आल्या. या उपक्रमांचा शुभारंभ थोरले बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे करण्यात आला. यावेळी उद्यानातील महाराणा प्रताप यांच्या जीवनपटावर आधारित माहिती फलकाचे अनावरण देखील झाले.
कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक विशाल धनवडे, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, अॅड.प्रताप परदेशी, डॉ.मिलिंद भोई, दीपक नागपुरे, उमेश चव्हाण, युवराज काची, कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर रजपुत, कार्याध्यक्ष स्वप्निल नाईक आदी उपस्थित होते.
हेमंत रासने म्हणाले, जेव्हा जेव्हा समाजावर संकटे आली, तेव्हा तेव्हा महापुरुषांचा उदय झाला. त्यांनी समाजाला घडविण्याची ताकद सर्वांना दिली. जगण्याचे ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्याप्रमाणे आपणही कार्य करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. प्रशांत जगताप म्हणाले, महाराणा प्रताप यांनी पराक्रमाची आणि सेवेची भावना आजही जिवंत ठेवली आहे. त्यामुळेच कोविडच्या काळात राजपूत समाज इतरांसाठी सेवा देत आहे.
अमित गायकवाड म्हणाले, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे युगपुरुष भारतात होऊन गेले. त्यांच्यामुळेच आपण आज अभिमानाने जगत आहोत, असेही ते म्हणाले. सामाजिक काम करण्याची संधी यानिमित्ताने आम्हाला मिळाली. चांगल्या ठिकाणी अस्थिविसर्जन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यापुढेही असेच काम करणार असल्याचे तिकोने बंधू व जावेद खान यांनी सांगितले.
किशोर रजपुत म्हणाले, राजपूत समाज विविध ठिकाणी विखुरलेला आहे. या समाजाने एकत्र आले पाहिजे. सामाजिक एकता म्हणजेच राष्ट्राची एकता आहे. अशी एकजूट कायम असू द्या. असेच विविध कार्यक्रम व उपक्रम आपण पुढील काळात राबविणार आहोत, असे सांगत लवकरच महाराणा प्रताप उद्यानात अश्वारुढ पुतळा बसवावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शैलेश बढाई, गोपी पवार, प्रमोद राणा, गणेश काची, उमेश काची, सोमनाथ परदेशी, सुनील परदेशी, डॉ.गणेश परदेशी, राजू परदेशी, संजय परदेशी, विजय परदेशी, प्रशांत बढाई, घनश्याम बढाई, राजाभाऊ रजपूत, प्रेम राठोड, किशोर परदेशी, सुदेश काची, विजय रजपूत यांसह पुणे शहरातील समस्त राजपुत संस्थांच्या प्रतिनिधींनी उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.
