स्त्री -पुरुष समानतेच्या अधिकाराची आजही अंमलबजावणी नाही- तृप्ती देसाई
पुणे : एकविसाव्या शतकात पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून महिला काम करीत आहेत. महिलांना दुय्यम स्थान देणा-या जुन्या रुढी परंपरांना आमचा विरोध आहे. अजूनही ग्रामीण भागामध्ये महिलांकडे चूल व मूल यापर्यंतच पाहिले जाते. स्त्री-पुरुष समानता हा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. त्याची अंमलबजावणी आजही होत नाही हे दुर्देव आहे, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.
न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पहिली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये तृप्ती देसाई या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सबलीकरण याविषयावर बोलत होत्या. लायन्स क्लब इंटरनॅशनल व लायन्स क्लब आॅफ ग्लोबल टिचर्स यांच्या सहकार्याने ही व्याख्यानमाला होत आहे. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या यू टयूब पेजवरुन ही व्याख्याने प्रसारित होत आहेत.
तृप्ती देसाई म्हणाल्या, चुकीच्या परंपरा मोडण्याची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्याकाळी केली होती. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांमुळे आम्ही अनेक आंदोलनांमध्ये यशस्वी होऊ शकलो. त्यामुळे डॉ.आंबेडकरांना केवळ अभिवादन करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना अंगी बाणवून तशा कृतीने काम केले पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या, हुंडा, लग्नामध्ये जात-धर्म भेद करणे देखील अत्यंत चुकीचे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवमुक्तीचा लढा याविषयावर व्याख्यात्या सुषमा अंधारे यांनी विचार मांडले. त्या म्हणाल्या, डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी लढा लढला. माणसा-माणसामध्ये भेद करणा-या धर्माला आम्ही त्यागत आहोत व समतेच्या वाटेवरुन जाणा-या मार्गाने आम्ही जात आहोत, असे सांगितले. समान नागरी कायद्याचे आग्रही पुरस्कर्ते डॉ.आंबेडकर होते. डॉ.आंबेडकर हे कोणत्याही जाती-धर्माचे नाही, तर अन्याय, असमानता तेथे त्यांचा विचार असे आहेत.
याशिवाय राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे डायरेक्टर प्रवीण रणसुरे इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनीही आपापले विचार मांडले.
