रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली
नवी दिल्ली – देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. अशा परिस्थिती कोरोना लसीपासून रेमडेसिवीर इंजेक्शनपर्यंतचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने रेमडेसिवीरची निर्यात थांबवल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारने घेतलेलं हे पाउल अत्यंत महत्त्वाचे आहे.
राज्यासह देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत आहे. काही खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा साठा पूर्णपणे संपला आहे. तसेच फक्त सरकारी रुग्णालयात रेमडेसिवीर उपलब्ध असल्याचे चित्र समोर आले आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे सुधारत नाही, तोपर्यंत रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.
माहितीनुसार, ज्या स्थानिक कंपन्या रेमडेसिवीर उत्पादन करतात. त्यांच्या वेबसाईटवर संपूर्ण साठ्याची माहिती टाकावी लागणार आहे. तसेच कोणत्या वितरकाच्या माध्यमातून पुरवठा करत आहेत, हे सुद्धा वेबसाईटवर टाकावे लागणार आहे. एवढेच नाहीतर जे औषधं निरीक्षक आहेत आणि जे कोणी यासंबंधित अधिकारी आहेत, त्यांना रेमडेसिवीरचा साठा किती शिल्लक आहे, आणि रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी कोणते नेमके पाऊल उचलतायत हे त्यांना जाहीर करावे लागणार आहे.
येत्या काळात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा उत्पादनात वाढ करण्यात औषध निर्माण विभागाने देशांतर्गत उत्पादकांशी संपर्क साधत आहे, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
