पंढरपूर पोटनिवडणूक – राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेंना उमेदवारी
मुंबई – पंढरपूरमध्ये विधानसभा पोटनिवडणूकीचे बिगूल वाजले आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणूक लढवली जात आहे. एप्रिल १७ ला पंढरपूरात निवडणूक होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आपला उमेदवार या पोटनिवडणूकासाठी रिंगणात उतरवत आहेत.
पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून आदरणीय शरद पवारसाहेबांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
पंढरपूर मतदारसंघातून ते नक्की विजय होतील असा विश्वास व्यक्त करतानाच भगीरथ भालके यांना जयंत पाटील यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, या पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून समाधान औताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय सांसदीय मंडळाने ही उमेदवारी जाहीर केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. समाधान औताडे हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले असून बांधकाम व्यवसायिक आहेत. तसेच ते साखर निर्मिती उद्योगात कार्यरत आहेत. सोलापूर येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालकपद ते भूषवित असून सोलापूर जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून औताडे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंगळवेढा तालुक्यात त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्य, वैद्यकीय तसेच रोजगार शिबिरांचे आयोजन केले आहे. लॉकडाऊन काळात श्री. औताडे यांनी विविध माध्यमातून गरजू समाजघटकांना सहाय्य केले आहे. तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठीही आवताडे विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करीत असतात.
