महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये, पवारांचा राऊतांवर निशाणा
मुंबई – कोणत्याही नेत्याने महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नये, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले, अशी टिप्पणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. राऊत यांचे नाव न घेता अजित पवार यांनी हे प्रत्युत्तर दिले जात आहे.
आज रविवारी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी हे भाष्य केले आहे. महाविकास आघाडीचे हे तीन पक्षांचे सरकार आहे. कुणाला मंत्री बनवायचे हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचे हा शरद पवार यांचा अधिकार आहे. आमचे तीन पक्षाचे सरकार आहे हे लक्षात घेऊन या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत याबाबत निर्णय घेतले आहे. त्यामुळे महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे अजित पवार यांनी नाराजीच्या सुरात सांगितले आहे.
