चिंताजनक! देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रातील
नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा भयावह रुप धारण केलं आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने देशापुढील समस्या अधिक वेगाने वाढत जातेय. त्यातच, महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. देशातील सर्वाधिक अॅक्टव्हि रुग्ण असलेल्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.
महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे.” असं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं.
“याशिवात गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७०० तर मध्य प्रदेशात १५०० रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत,” अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे”.
