Friday, September 4, 2026
PUNETOP NEWS

ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी यांना 2021 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर


पुणेः- उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशात, तसेच जगभर पोहोचविणा-या बाबासहेब नीळकंठ कल्याणी यांना 2021 चा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देणयाचे निश्चित केलेे आहे. कोविड-19 चे सामुदायिक संकट कमी झाल्यानंतर एका खास समारंभात हा पुरस्कार सोहळा होईल. त्याचवेळी स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर लढतांना जखमी झालेल्या काही जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसई यांनी आज जाहीर केले.

2020 मध्येच ही निवड करण्यात आली होती, पण कोविड 19 च्या वाढत्या संकटामुळे गेल्या वर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नाही. पुरस्काराचे यंदाचे 32 वे वर्ष. स्मृतिचिन्ह आणि रूपये 1,00,000 (एक लक्ष) रकमेची थैली असे पुण्यभूषण पुरस्काराचे स्वरूप आहे. बाबा नीळकंठ कल्याणी हे एकूण 3.0 बिलीयन डॉलर्सची उलाढाल असणा-या कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीज् मधील अग्रग्ण्य कंपनी असलेल्या भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
यावेळी नाईक – धरमवीर सिंग, नाईक – सुरेश कुमार कर्की, शिपाई – के. नागी रेड्डी, श्रीमती हौसाबाई पाटील (सातारा) आणि माधवराव माने (सांगली) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पुण्यभूषण पुरस्कार प्रदान समारंभ 2021 आणि
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर लढताना जखमी होऊन अपंग झालेल्या जवानांचा गौरव सोहळा

(१) नाईक – धरमवीर सिंग (वय ५६) : दीमापूर (नागालँड) येथे कर्तव्य बजावित असताना १९९६ मध्ये झालेल्या खाण- स्फोटात (बॅटल कॅज्युल्टी) जखमी होऊन अपंगत्व. गेली २० वर्षे पीआरसी खडकी येथे अॅडमिट. उत्तम थ्रो- बॉल पटू असून मृदु स्वभाव, कष्टाळू आणि कामामध्ये अचूकता व चोखपणा या गुणांमुळे प्रसिद्ध आहेत.

(२) नाईक – सुरेश कुमार कर्की (वय ४६) :७ जुलै २००४ मध्ये, बुलेट्सनी जखमी झालेल्या जवानाला अॅम्ब्युलन्समधून सीख रेजिमेंट ते गोहत्ती बेस हॉस्पिटलला नेत असताना खाजगी बसने दिलेल्या धडकीमुळे अॅम्ब्युलन्स उलटून झालेल्या दुर्घटनेत मज्जा-रज्जूला इजा होऊन अपंगत्व. २०११ पासून खडकी पीआरसी मध्ये (कुटुंबासह) आहेत. उत्कृष्ट व्हिल-चेअर बास्केट-बॉल खेळाडू असून उत्तम व्हिलचेअर मॅराथॉन रनर व जलतरणपटूही आहेत.

(३) शिपाई – के. नागी रेड्डी (वय ४५) :कर्तव्यावर असताना झालेल्या वाहन अपघातामध्ये मज्जा-रज्जूला (मणके फ्रॅक्चर होऊन) इजा व त्यामुळे अपंगत्व. राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट व्हिलचेअर बास्केटबॉलपटू असून २०१४-२०१८ मध्ये महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय ट्रॉफी मिळवून देण्यात मुख्य सहभाग. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण, रजत पदके प्राप्त.

(४) श्रीमती हौसाबाई पाटील (सातारा) :- वय वर्षे ९६. क्रांतीसिंह नाना पाटील ह्यांची नात. स्वातंत्र्य संग्रामात विविध प्रकारे सहभाग. भूमीगत सहका-यांशी संपर्क ठेवून त्यांना मदत केली. पत्रके वाटणे, विविध प्रकारांनी त्यांच्याशी सतत संपर्कात राहून कार्य केले.

(५) श्री. माधवराव माने (सांगली) :१९४२ च्या चले जाव आंदोलनात प्रामुख्याने सहभाग. इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा पुकारल्यामुळे इंग्रज सरकार त्यांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत. परंतु त्यांना हुलकावणी देत त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने लढा चालूच ठेवला. रेल्वेचे रूळ उखडणे, टेलिफोन संपर्क तोडणे अशा त-हेने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading