Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

बार्टी (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर स्थगित:९ सप्टेंबरपासून मुंबईत एल्गार!

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी न्याय्य हक्काच्या सरसकट फेलोशिपसाठी पुणे येथील समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले प्रदीर्घ आमरण उपोषण अखेर आज सकारात्मक आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. बार्टीच्या निबंधक सुचिता शिंदे आणि जात पडताळणी विभागाचे उपायुक्त संजय कदम यांच्या उपस्थितीत आंदोलक विद्यार्थ्यांनी ज्यूस पिऊन आपले उपोषण सोडले.

मागील अनेक दिवसांपासून बार्टीच्या विद्यार्थ्यांनी ३० ऑक्टोबर २०२३ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा आणि २०२३, २०२४ व २०२५ च्या सर्व पात्र संशोधकांना पूर्वलक्षी प्रभावाचा अन्याय न करता सरसकट फेलोशिप द्यावी, या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली.
नेत्यांच्या मध्यस्थीने शासकीय पातळीवर सकारात्मक हालचाली
मुंबईत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या शासकीय निवासस्थानी आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनचे मार्गदर्शक राहुल डंबाळे आणि सचिव राहुल नागटिळक यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत राहुल डंबाळे व राहुल नागटिळक यांनी मांडलेल्या कायदेशीर मुद्द्यांची दखल घेत, ३० ऑक्टोबर २०२३ पूर्वी नोंदणी झालेल्या २०२३ च्या विद्यार्थ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने नियम लागू न करता, २०२२ च्या निकषानुसार सरसकट फेलोशिप देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

या पार्श्वभूमीवर, बार्टीच्या महासंचालक दिपा मुधोळ-मुंडे यांनीदेखील शासनाच्या प्रधान सचिवांना अधिकृत पत्र लिहून विद्यार्थ्यांवर पूर्वलक्षी प्रभावाने अन्याय न करता ‘सारथी’ व ‘महाज्योती’च्या धर्तीवर सरसकट फेलोशिप मंजूर करण्याची भक्कम शिफारस मंत्रालयाकडे केली आहे.

उपोषणार्थींच्या एकजुटीने उपोषणाची सांगता
मंत्रालयातून आणि बार्टी प्रशासनाकडून मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकारात्मक आणि ठोस पावले उचलली गेल्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर, आंदोलक विद्यार्थ्यांनी तूर्तास आपले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आज आंदोलनस्थळी बार्टी निबंधक सुचिता शिंदे व अधिकारी संजय कदम यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली व प्रमुख उपोषणार्थी संशोधक विद्यार्थी श्रीमती सुरेखा वासनिक, श्री. किरण देवकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्यवरांच्या हस्ते लिंबू पाणी आणि ज्यूस घेऊन उपोषणाची सांगता केली.

आता लक्ष २०२४ व २०२५ च्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी; ९ सप्टेंबरपासून मुंबईत एल्गार!

पुण्यातील आमरण उपोषण जरी स्थगित झाले असले तरी विद्यार्थ्यांचा संपूर्ण लढा अद्याप संपलेला नाही. दरम्यान, जे विद्यार्थी सर्वंकष समान धोरण निर्णय लागू झाल्यानंतरचे म्हणजेच सन २०२४ व २०२५ चे आहेत, त्यांच्या फेलोशिपचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनचे मार्गदर्शक मा. राहुल डंबाळे यांनी पुढील मोठ्या आंदोलनाची अधिकृत घोषणा केली आहे. २०२४ व २०२५ च्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आगामी ९ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे राहुल डंबाळे यांनी स्पष्ट केले आहे. २०२३ च्या विद्यार्थ्यांप्रमाणेच २०२४ व २०२५ च्याही विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी डॉ राहुल ससाने, हर्षवर्धन दवने , प्रवीण खंडारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading