नरेंद्र मोदींनी शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचवला – मुरलीधर मोहोळ
पुणे ता २७ : देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींनी शेवटच्या घटकां पर्यंत विकास पोहचवून सुशासन कसे असावे याचे उदाहरण दिले आहे. असे उद्गार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले.
पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी औंध- बोपोडी भागातील लोकांसाठी आयुष्यमान भारत योजनेचे शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी ते बोलत होते.
यावेळी स्थायी समिती सदस्य प्रकाश ढोरे, शिवाजीनगर मतदार संघाचे सरचिटणीस आनंद छाजेड,खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव गणेश नाईकरे, खडकी मंडळाचे युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, ज्येष्ठ सदस्य अनिल भिसे, रमेश नाईक, कैलास टोणपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, औंध – बोपोडी भागातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेचे आयोजन सुनिल माने यांनी केले या शिबिराला मनापासून शुभेच्छा. सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी येत असतात मात्र या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कार्यरत असतात. पंतप्रधान मोदींनी गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. याचा विचार करता समाजातील सर्व घटकांना सामावून घेता यईल असाच विचार त्यातुन दिसून येतो. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून देशातील करोडो महिलांना गॅस सिलेंडर मोफत दिले. जनधन योजने अंतर्गत गरीबातल्या गरीब व्यक्तीचे बँकेत अकाउंट उघडले गेले. यामुळे शेतकऱ्यांच्या तसेच सर्वसामान्यांच्या खात्यात थेट पैसे जाऊ लागले. काँग्रेसच्या काळात एक रुपयामधील 15 पैसे लोकांना मिळत होते. 85 पैसे मधल्या व्यवस्थेत जात होते. नरेंद्र मोदींनी मात्र ती व्यवस्था बदलली. त्यांनी जी योजना आणली ती शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल याची व्यवस्था केली. त्यापैकीच आयुष्यमान भारत ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबाला आयुष्यभरासाठी पाच लाख रुपयांचे विमा कवच त्यांनी उपलब्ध करून दिले. यातूनच त्यांनी सुशासन कसे असावे याचे उदाहरण दिले आहे.
सुनील माने म्हणाले, महापौर मुरलीधर मोहोळ पुणेकरांच्या शाश्वत विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण जनकल्याणाच्या योजना राबवत आहोत. गोरगरीब लोकांना विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचा आजचा तिसरा दिवस असून आतापर्यंत हजारो लोकांनी आपली नाव नोंदणी केली आहे. आणखी दोन दिवस हे शिबीर चालणार असून अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा.
आशा कांबळे यांचे प्रामाणिक पणा प्रेरणादायी : मोहोळ
महानगरपालिकेत स्वच्छतासेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या आशा कांबळे यांनी त्यांच्या खात्यात चुकीने जमा झालेले 1 लाख 35 हजार प्रामाणिक पणे परत केले. त्याबद्दल त्यांचा सुनील माने यांच्या वतीने महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोहोळ यांनी आशा कांबळे यांचे कौतुक करत असताना सध्याच्या युगात त्यांचा प्रामाणिकपणा प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.