Wednesday, June 17, 2026
PUNE

भारताच्या सेवायज्ञाला जगात तोड नाही- रवींद्र वंजारवाडकर यांचे मत

पुणे : भारतामध्ये लोकसंख्या मोठया प्रमाणात असली, तरी देखील आपण कोरोनासारख्या संकटावर मात करीत आहोत. योग, आयुर्वेद, खादयसंस्कृती आणि कुटुंबपद्धती या भारतीय जीवनशैलीमुळे आपण हे करु शकलो. केवळ स्वत:पुरते नाही, तर संपूर्ण जगाचे कल्याण चिंतणारा भारत देश आहे. त्यामुळे कोरोना काळातील भारताच्या सेवायज्ञाला जगात तोड नाही, असे मत रा.स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी व्यक्त केले. 

नादब्रह्म ढोल-ताशा व ध्वज पथकातर्फे सदाशिव पेठेतील भरत नाटय मंदिरात नादब्रह्म पुरस्कार आणि संजीवनी नादब्रह्म पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अण्णा थोरात, बाळासाहेब दाभेकर, प्रवीण परदेशी, गणेश घुले, दत्ता सागरे, पराग ठाकूर, धनंजय वाडकर, पथकाचे संस्थापक अध्यक्ष अतुल बेहेरे आदी उपस्थित होते.
समाजसेवा हाच परमोधर्म मानणा-या, समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि कोरोना काळात समाजासाठी बहुमूल्य योगदान दिलेल्या डॉ.गौतम छाजेड आणि जावेद खान यांना नादब्रह्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रुपये ११ हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरुप होते. तर, गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने अशोक तुपे यांना गौरविण्यात आले. पुरस्कारार्थींच्या पत्नी मनिषा छाजेड, फिरोजा खान व सुरेखा तुपे देखील पुरस्कार स्विकारताना उपस्थित होत्या. 


कार्यक्रमात सारंग सराफ, सचिन जामगे, ॠषिकेश बालगुडे, समीर धनकवडे, निरंजन दाभेकर, आनंद सागरे, नगरसेवक अजय खेडेकर, धीरज घाटे, वसंत मोरे, शिरीष मोहिते, राजाभाऊ भिलारे, चंद्रकांत सणस, उदय जोशी, रामलिंग शिवणगे, दीपक मानकर, किरण सावंत, छाया जगताप यांना संजीवनी नादब्रह्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सन्मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप होते. नादब्रह्म पथकातर्फे अयोध्येतील राम मंदिर निर्माणाकरीता १ लाख रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला. मयूर काकडे यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. 

रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, संकटकाळात मदतीचा हात दिलेल्या, भुकेलेल्यांना जेवण दिलेल्या, मृतांवर संस्कार करणा-या, गरजू कुटुंबांना मायेचा आधार देणा-या सेवाव्रतींमध्ये केवळ मोठेपणाचा नाही, तरकृतज्ञतेचा भाव आहे. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे. धैर्य, संयम, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि शासनांच्या सूचना पाळणारा सामान्य पुणेकर देखील कोरोना वॉरिअर असल्याचे त्यांनी सांगितले.

पराग ठाकूर म्हणाले, जेव्हा कोरोनाच्या उन्हाचे चटके समाजाला लागत होते, तेव्हा माणुसकीचे झरे बनून सेवेक-यांनी कार्य केले आहे. माणूस माणुसकीला परका झाला होता, त्यावेळी रस्त्यावर उतरुन अनेकजण काम करीत होते. अशा माणसांच्या गुणांचे कौतुक वादनापलिकडे जाऊन एका ढोल-ताशा पथकाने करणे ही विशेष बाब आहे. यापुढे कोरोनाचा सामना करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळू पण एकमेकांतील मनाचे अंतर ठेऊ नका, असेही त्यांनी सांगितले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

* जावेद खान यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणाकरीता दिले ११ हजार रुपये
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील राम मंदिर निर्माणाचे कार्य मोठे आहे. त्यामध्ये आम्हाला देखील यामध्ये सहभागी करुन घ्या. आज पुरस्कारासोबत मिळालेली ११ हजार रुपयांची रक्कम मी राममंदिराकरीता देत असल्याचे नादब्रह्म पुरस्कारप्राप्त जावेद खान यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading