माझ्या सुरक्षेतही कपात करा; शरद पवारांचा गृहमंत्र्यांना फोन
मुंबई, दि. 10 – महाविकास आघाडी सरकारने राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुडबुद्धीने महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. सुरक्षेची गरज असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा आरोप भाजपचे नेते करत आहेत. याच पार्श्वभूमीवरून आता माझी सुरक्षा कमी करा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून सांगितल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.
सुरक्षा कपातीबद्दल अनिल देशमुख काय म्हणाले?
अनिल देशमुख म्हणाले की, ‘आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती केली. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘ज्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, त्याप्रमाणे आम्हाला अहवाल द्यावा.’ त्यानंतर हा अहवाल आम्ही मान्य केला आणि त्यानुसार राज्य शासनाने आदेश दिले आहेत. हे आदेश दिल्यानंतर मला शरद पवारांचा फोन आला आणि पत्र आले. त्यांनी मला सांगितले की, ‘माझी सुद्धा सुरक्षा कमी करावी.’ ज्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यानुसार या सर्व गोष्टी ठरल्या आहेत. कोणी विरोधी पक्षाचा आहे, अशातला हा भाग नाही आहे.’