सदाभाऊ खोत यांनी घेतली राज्यपालांची भेट, सुचविली ‘ही’ 12 नावे
मुंबई, दि. 25 – रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची राजभवन येथे भेट घेतली. भेटी दरम्यान खोत यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी नावे सुचविली आहेत.
राज्यात लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांना वाढीव रकमेची बिले देण्यात आली असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 मार्चपासुन लाॅकडाऊन सुरू करण्यात आले व लॉकडाऊन मुळे व्यापारी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. असे असताना लाॅकडाऊनच्या काळातील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल 300 युनिटचे देण्यात आले देण्यात आले. तरी वाढीव वीज बिल तात्काळ माफ करणे बाबत शासनाचे निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली.
राज्यातील शेतकऱ्यांना मागील काही वर्षापासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ अतिवृष्टी गारपीट नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासुन पावसाने जोरदार हजेरी लावली शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र या नुकसानीमुळे शेतीसाठी झालेला खर्च वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे व राज्यातील शेतकऱ्यांची चालू पीक कर्ज माफ करून आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी विनंती सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल महोदयांकडे केली. तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा विधेयकाचे राज्यात तात्काळ अंमलबजावणी करण्याकरिता राज्य सरकारला सूचना देणेबाबत देखील विनंती केली. तसेच महात्मा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान त्वरित देण्यात यावी, अशी विनंती केली. तसेच कोरोनाच्या या महाभयंकर काळामध्ये जे आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, खाजगी डॉक्टर, तसेच राज्यभरातील अनेक पत्रकार कोरोनामुळे मृत्यु पावले अशा व्यक्तिंना शासनाकडून 50 लाख रुपये देणेबाबत शासनाने सांगितले होते. परंतु तसे होताना दिसत नाही. तरी याबाबत देखील आपण सूचना कराव्यात अशी विनंती करण्यात आली.
आमदार नियुक्तीसाठी राज्यपाल महोदयांना सुचवली नामवंत अन् योग्य अश्या 12 लोकांची यादी
1) मकरंद अनासपुरे (कला, सामाजिक कार्य, 2) विठ्ठल वाघ (लेखन व साहित्यिक), 3) विश्वास पाटील (लेखन व साहित्यिक), 4) जाहीर खान
(क्रीडा), 5) मंगलाताई बनसोडे
( कला ), 6) अमर हबीब
(सामाजिक कार्य व पत्रकार), 7) निवृत्ती महाराज इंदुरीकर
( सामाजिक कार्य व प्रबोधन), 8) पोपटराव पवार
(सामाजिक कार्य), 9) डॉ. तात्याराव लहाने
( आरोग्य सेवा), 10) डॉ. प्रकाश आमटे (सामाजिक कार्य), 11) सत्यपाल महाराज
(सामाजिक कार्य व प्रबोधन), 12) श्री बुधाजीराव मुळीक (शेती)
या व्यक्तींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी अशी विनंती करण्यात आली.
या शिष्टमंडळामध्ये रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दिपक भोसले, राज्य कार्यकारणी सदस्य सुहास पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक पगार, राज्यप्रवक्ते भानुदास शिंदे, राज्यप्रवक्ते लालासो पाटील, राज्यप्रवक्ते जितु आडिलकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य व कोल्हापुर संपर्कप्रमुख प्रा. एन. डी. चौगुले, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा निता खोत उपस्थित होते.
