मराठा आरक्षण – सुप्रीम कोर्टाने सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली
नवी दिल्ली – मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढील चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. सुरुवातील ज्य सरकारच्या वतीने वकील मुकुल रोहतगी वेळेत हजर न राहिल्याने तहकुबीची वेळ आली होती. मात्र, आता सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या संदर्भात आज सकाळी 11 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली. परंतु राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी नसल्यामुळे सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या वतीने एकही वकील उपस्थित न राहल्याने सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
आरक्षणाला स्थगिती देताना प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात आलं होतं. परंतु आजची सुनावणी नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे पार पडली. याच खंडपीठाकडून आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी यासंबंधी बोलताना ज्या खंडपीठाने स्थगिती दिली त्यांच्यासमोर सुनावणी न होता दुसऱ्या खंडपीठासमोर घेण्यात यावी अशीही विनंती करणार असल्याचं म्हटलं होतं. “मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हायला हवी ही फक्त सरकारचीच नाही तर सर्व याचिकाकर्त्यांची भूमिका आहे,” असंही अशोक चव्हाण म्हणाले होते. “मराठा आरक्षणावरुन आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मंजुरी मिळावी हीच आमची भूमिका आहे. तसंच हा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
