Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENT

हंगामा प्ले सादर करत आहेत ‘लव का पंगा’ नवा ओरिजनल रोमँटिक कॉमेडी शो

हंगामा प्ले या हंगामा डिजिटल मीडियाच्या मालकीच्या आघाडीच्या व्हिडीओ ऑन डिमांड व्यासपीठाने आज ‘लव का पंगा’ हा नवा हंगामा ओरिजनल शो सादर केला. आशा नेगी आणि अंश बागरी या लोकप्रिय कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला हा शो मनालीच्या निसर्गसुंदर पर्वतरागांमध्ये चित्रित करण्यात आला आहे. आजकालचे तरूण प्रेम आणि रोमान्सचे काहीसे गमतीशीर चित्रण आहे. एक छानसी सुट्टी घालवण्यासाठी एकटीच बाहेर पडलेली शहरी आधुनिक तरुणी आणि पृथ्वीवर आपणच सगळ्यात कुल आहोत असं समजणारा देसी मुंडा यांना अनेक घटना एकत्र आणतात आणि त्यातून आयुष्याला एक नवे वळण लाभते. एबज़ ओरिजनलची निर्मिती असलेल्या या शोचे दिग्दर्शन नितेश सिंग यांनी केले आहे.

नेहा (आशा नेगी) ही दिल्लीतील उच्चशिक्षित, सोफेस्टिकेटेड मुलगी मनालीच्या सुंदर पर्वतरांगांमध्ये शांतपणे सुटी घालवण्यासाठी एकटीच निघाली आहे. एकटीने केलेली ही तिची पहिलीच ट्रिप आहे. तर दुसऱ्या बाजूला सुमित  (अंश बागरी) हा काहीसा अधिक बोलणारा देसी हरयावणवी छोरा आहे. आजचा क्षण आनंदा जगायचा, हे त्याचं सूत्र आहे. नकळत घडलेल्या अनेक घटना त्यांना वारंवार एकत्र आणतात आणि त्यांचे ठरलेले प्लॅन न होता वेगळंच काही घडतं. सुमीतच्या मते तो तिला मदत करतोय तर नेहाला वाटतंय तो ‘चीप’ आहे. सुमीतला वाटतंय नेहामध्ये फार अॅटिट्यूड आहे आणि नेहाच्या मते सुमीतला एक चमाट द्यायला हवी. अर्थात, या सगळ्या गैरसमजांच्या मध्ये कुठेतरी त्यांच्यात मैत्रीचं नातं सुरू झालंय आणि त्यातून वेगळंच काही फुलणार आहे. पण, यातून शेवट गोड होईल का? त्यांच्यातील मतभेद मिटतील का? की नशीबाने त्यांच्यासाठी काही वेगळंच लिहून ठेवलंय?

या शोबद्दल हंगामा डिजिटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले, “आमच्या व्यापक नेटवर्कवरील ओरिजनल कंटेंटची मागणी गेल्या दोन वर्षांत प्रचंड वाढली आहे आणि पुढील वर्षापर्यंत ती तिप्पट वाढेल, अशी अपेक्षा आहे. विविध शैली, भाषा, कथा आणि कथा सांगण्याच्या प्रकारांमधील वैविध्यासह ही मागणी पूर्ण करण्यास हंगामा ओरिजनल्स अगदी योग्य स्थानावर आहे. लव का पंगामध्ये दमदार कलाकार, निसर्गरम्य स्थळे आणि सर्व भागांमधील जोडप्यांना आपलीशी वाटेल अशी कथा आहे. दर चार ते सहा आठवड्यांमध्ये एक नवा ओरिजनल शो सादर करण्याच्या आमच्या धोरणात आम्ही सातत्य ठेवले आहे. या सर्व शोचे आमच्या जागतिक वितरण नेटवर्कच्या माध्यामातून व्यापक प्रदर्शन केले जाते.”

या सीरिजबद्दल शोचे दिग्दर्शक नितेश सिंग म्हणाले, “या शोमधील तरुण, आधुनिक काळातील प्रेमकथा प्रेक्षकांशी लगेच नाते जोडेल. मनालीच्या निसर्गसुंदर पर्वतरांगांमध्ये चित्रित केलेल्या या शोमध्ये प्रेक्षकांना, एकमेकांहून अगदी भिन्न असलेल्या नेहा आणि सुमीत या दोन मुख्य व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील चढउतारांनी भरलेला एक प्रवास अनुभवता येणार आहे. एक दिल्लीतील क्लासी तरुणी आहे तर दुसरा देसी हरयाणवी मुंडा. त्यांच्यातील संवाद, विसंवाद सगळंच प्रेक्षकांना संपूर्ण शोमध्ये मनोरंजनाचा डोस देत राहील.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading