कोरोनाच्या पाश्वभूमीवर वीजदर वाढ रद्द करावी; नगरसेविका श्र्वेता महेश गलांडे-खोसे यांची मागणी
पुणे, दि. 22 – लॉकडाऊनमध्ये केवळ वीज वापर वाढला म्हणून नव्हे तर एप्रिलपासून लागू झालेल्या वीज दरवाढीमुळे घरगुती ग्राहकांची बिले फुगली आहेत. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीत अनेकांचे रोजगार गेले, अनेकांना पूर्ण वेतन मिळत नाही या सर्व परिस्थिती चा विचार करून राज्य सरकारने 1 एप्रिल पासून लागू केलेली वीज दरवाढ रद्द करावी अशी मागणी नगरसेविका श्वेता महेश गलांडे – खोसे यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

ऊर्जा मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नगरसेविका श्वेता महेश गलांडे – खोसे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारी मुळे 20 मार्च 2020 पासून राज्या मध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदीची लाट आली आहे. अनेक तरुण बेरोजगार झाले आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. नागरीकांचे खाण्याचे वांदे झाले आहेत. या परिस्थिती मध्ये महावितरणने 1 एप्रिल 2020 पासून वीज दरवाढ केली. त्यापूर्वी स्थिर आकार दरमहा ९० रुपये होता, तो १०० रुपये झाला. वहन आकार १.२८ रु. प्रति युनिट होता, तो १.४५ रु. प्रति युनिट झाला. वीज आकार पहिल्या १०० युनिटस साठी ३.०५ रु. प्रति युनिट होता. तो ३.४६ रु. प्रति युनिट केला. १०० युनिटसच्या पुढील १०१ ते ३०० युनिटस पर्यंतचा दर पूर्वी ६.९५ रु. प्रति युनिट होता, तो आता ७.४३ रुपये प्रति युनिट झाला. ३०० युनिट्सच्या पुढील ३०१ ते ५०० युनिटस पर्यंतचा दर पूर्वी ९.९० रुपये प्रति युनिट होता, तो १०.३२ रुपये प्रति युनिट झाला आहे. एकूण वाढ १०० युनिट्सच्या आतील ग्राहकांसाठी सरासरी १६% आहे व १०० युनिटसच्या वरील ग्राहकांसाठी सरासरी दरवाढ १३% आहे. या दरवाढीमुळे नागरीकांची वीज बिले वाढली आहे.
कोरनामुळे खाण्याची भ्रांत असणा-या वीज दरवाढीचा शॉक लागत आहे. नागरिकांनी खायचे की वीज बिल भरायची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्याची परिस्थिती लक्षात माननीय उर्जा मंत्री यांनी वीज दर वाढ रद्द करावी ही विनंती. तसेच, लॉकडाऊन च्या काळात स्थिर आकार रद्द केल्यास नागरीकांना दिलासा मिळेल
