अभिनेता गोविंदाचा बॉलिवूडच्या घराणेशाहीवर हल्लाबोल
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा विषय ऐरणीवर आला आहे. नव्वदीतील सुपरस्टार अभिनेता गोविंदा याने सुद्धा आता बॉलिवूडच्या घराणेशाहीवर हल्लाबोल करत बॉलिवूड फक्त चार ते पाच घराणी चालवितात, असा आरोप केला आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिने निर्माता दिग्दर्शक करण जोहर, आदित्य चोप्रा, महेश भट्ट आणि सलमान खान यांच्यासारख्या दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. हाच धागा पकडून अभिनेता गोविंदा म्हणतो, मी ज्यावेळी बॉलिवूडमध्ये आलो त्यावेळी फक्त टॅलेंटवरच अभिनेत्यांना संधी देण्यात येत होती. मी एकेकाळचा सुपरस्टार अरुण कुमार आहुजा आणि अभिनेत्री निर्मलादेवी यांचा मुलगा असूनही मला बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले. पूर्वी ज्यांच्याकडे टॅलेंट होते त्यांना काम मिळत होते. सगळ्या चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत होती. परंतु आता चार-पाच लोकांनी संपूर्ण कारभार हातात घेतला आहे. त्यामुळे जे लोक त्यांच्या जवळचे नाहीत, त्यांच्या चित्रपटाचे नशीब हेच ठराविक लोक ठरवितात. माझ्या काही चांगल्या चित्रपटांना या लोकांनी प्रदर्शितच होऊ दिले नाही. सुशांत सिंह याच्याबाबतही हेच घडले, असे गोविंदाने म्हटले आहे.
