Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशन व हिंदुजा फाउंडेशतर्फे चक्रीवादळग्रस्तांना ५० लाखाची मदत

पुणे, दि. २७ – फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फाउंडेशन व हिंदुजा फाउंडेशतर्फे रत्नागिरी, रायगडमध्ये चक्रीवादळग्रस्तांना ५० लाखाची मदत करण्यात आली. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक गावांना मोठा तडाखा बसला होता. अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. या दोन जिल्ह्यातील ३३३ कुटुंबाना उभे करण्याचे काम मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारातून झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व मंडणगड तालुक्यातील १२०, तर रायगड जिल्ह्यातील ताळा, श्रीवर्धन व दिवेआगार या तालुक्यातील २१३ कुटुंबाना घरावरील पत्रे, सोलर लाईट, ब्लॅंकेट, धान्य आदी वस्तू देण्यात आल्या. प्रत्येकी २० पत्रे याप्रमाणे जवळपास सहा हजार पत्रे, मोबाईल चार्जरची सोय असणारे सोलर दिवे आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत गरीब कुटुंबाना मदत दिल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन व ताळा तालुक्यातील निराधार कुटुंबाना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार या दोन्ही तालुक्यात ११३ व दिवेआगारमधील १०० कुटुंबाना दुसऱ्या टप्प्यात मदत देण्यात आली.

मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. त्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला. ज्यांना काहीच आधार नाही, अशा गरजू कुटुंबाना ही मदत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने देण्यात आली आहे. यापुढेही गरजू कुटुंबाना फाउंडेशनच्या वतीने मदत केली जाणार आहे.”

“रितू छाब्रिया यांनी सामाजिक जाणिवेतून फिनोलेक्स पाईप्स, मुकुल माधव फाउंडेशन आणि हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास रायगडमधील २१३ कुटुंबाना मदतीचा हात दिला आहे. ज्यांचे घर पडले आहे, लाईट्स गेल्यात त्यांना पत्रे, सोलर लाईट व अन्य साहित्य देण्यात आले आहे. या मदतीसाठी रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सर्वांचे ऋण व्यक्त करते.”
अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading