Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ११ हजाराहूनअधिक प्रवासी मुंबईत दाखल

मुंबई, दि. १५: ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ७२ विमानांमधून तब्बल ११ हजार ६६६ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ४३१३ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ३७२९ इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ३६२४ इतकी आहे.या सर्व प्रवाशांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे क्वारंटाईन करण्यात येत आहे.

हे प्रवासी ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, रोम, जर्मनी, दुबई, मालदीव, वेस्टइंडिज आदी देशातून मुंबईत दाखल झाले आहेत.

१ जुलैपर्यंत आणखी ३७ विमानांनी प्रवासी येणे अपेक्षित

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक २४ मे २०२० रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याअनुषंगाने आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मुंबईतील प्रवाशांच्या संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था विविध हॉटेल्समध्ये करण्यात येत आहे. इतर राज्यातील व महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने वंदे भारत अभियान महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading