Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

आता शाळाही अधांतरीच, सरकारची निर्णय क्षमता संपली, सरकारच्या निर्णयाचा धिक्कार – प्रकाश आंबेडकर

पुणे, दि. १५ – देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता covid-19 च्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे. तीच गत महाराष्ट्राची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला.

राज्यात शाळा चालू करायच्या की नाही हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अधांतरी होता. आज मात्र मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जिल्हा पातळीवर ढकलून दिला. याचाच अर्थ यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही. राजकीय नेतृत्व नाही, दूरदृष्टी नाही आणि बेभरवशावरती हे राज्य सोडून दिले आहे. ही अवस्था ‘जाणता राजा’ची पण असल्याची खरमरीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. केंद्रात मोदी नेतृत्व करू शकत नाही ते निर्णय घेऊ शकत नाही, आपले निर्णय राज्यावर सोडून देतात आणि राज्यातले लोक जिल्ह्यावर निर्णय सोडून देतात. हे आजच्या निर्णयावरून दिसून आले. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो. शासनाला आमची विनंती आहे की, शाळा सुरू करायच्या की नाही हा निर्णय लवकर घ्या, नाही करायच्या असतील तर तसे स्पष्ट सांगा, करायच्या असतील तर केव्हा करणार, याचे वेळापत्रक जाहीर करा, वेळापत्रक जाहीर करताना जर तरची भाषा वापरायची नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading